सातारा -जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पडघम पुन्हा वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड या आठ पालिका व मेढा नगरपंचायत अशा नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियमाप्रमाणे प्रभाग रचनेसंदर्भात पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार प्रभाग रचनेसाठी हरकती आणि सूचना मागवण्यास 10 ते 14 मेपर्यंतचा कालावधी निर्धारित झाला आहे. या हरकती आणि सूचनांवर 23 मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घ्यावयाची आहे. 30 जूनपर्यंत हरकतींचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला पाठवायचा असून 6 जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करून त्याला मान्यता द्यावयाची आहे.
त्यानंतर प्रारुप मतदारयादी हरकती- सूचना अंतिम मतदारयादी, वॉर्ड आरक्षण, नगराध्यक्ष आरक्षण हे कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. प्रभाग रचना अंतिम करण्याबाबत यापूर्वीचे संबंधित आदेश अधिक्रमित करून राज्य निवडणूक आयुक्तांनी त्यांचे अधिकार संबंधित मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना प्रदान केले आहेत. “अ’ वर्ग असलेल्या सातारा आणि “ब’ वर्ग असलेल्या फलटण आणि कराड नगरपालिका यांच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोग मंजुरी देणार आहे. “क’ वर्ग असलेल्या वाई, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर या नगरपालिकांच्या प्रभाग रचनांना विभागीय आयुक्त मंजुरी देणार आहेत. सूचना व हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवणार आहेत.
राजकीय वारेही वाहू लागले…
नऊ ठिकाणी हालचाली; 14 मे पर्यंत हरकती, सहा जून रोजी होणार अंतिम प्रभाग रचनानिवडणूक आयोग निवडणुकांच्या तयारीला लागल्यामुळे जिल्ह्यात राजकीय वारे जोरात वाहू लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील लवकरच जिल्हा दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील 121 मंडल प्रमुखांची बैठक घेतली जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससुद्धा या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीत असून प्रदेश कार्यकारिणीच्या माध्यमातून तयारीचा आढावा घेतला जाणार असल्याचे सूतोवाच विधानपरिषदेचे पक्षप्रतोद शशिकांत शिंदे यांनी केले आहे. नगरपालिका निवडणुकांचा रागरंग पाहून शिवसेनेनेसुद्धा जिल्ह्यात 25 मेपासून शिवसंपर्क अभियानाची घोषणा केली आहे.
अभियानाच्या संपर्क प्रमुखपदी ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांची नेमणूक करण्यात आली असून संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांची या समितीवर वर्णी लावली जाणार असल्याची चिन्हे आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडी व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीच्या माध्यमातूनही आढावा सत्र सुरू झाले असून सातारा शहरांमध्ये गाठीभेटीच्या सत्रांना सुरुवात झाली आहे.