पाटना – सध्या करोना संसर्घ देशात थैमान घालत आहे. त्यामुळे हृदयद्रावक घटना कानावर पडत आहे. बिहारमधून अशीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून येथे लग्नानंतर पाच तासांत नववधूचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर नवरदेवानेच नववधुच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. नववधु आठवड्याभरापासून सर्दी-खोकल्याने त्रस्त होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील अफजल नगर पंचायती अंतर्गत खुदिया गावातील रंजन यादव यांची कन्या निशाचा विवाह 8 मे रोजी झाला. हवेली खड़गपूर प्रखंडमधील महकोला गावात राहणाऱ्या सुरेश यादव यांचा पुत्र रवीशसोबत तिची लगीनगाठ बांधली गेली. मात्र सिंदूरदान या विधीनंतर नववधूची तब्येत अचानक खालावली. त्यानंतर निशाला तातडीने भागलपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला.
नववधूला आठवड्याभरापासून सर्दी-खोकल्याचा त्रास सुरु होता. लग्नानंतर नववधू निशाची तब्येत आणखी बिघडू लागली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेते, परंतु तिने अखेरचा श्वास घेतला. ज्याच्यासोबत आयुष्यभराची गाठ बांधली गेली त्या नवरदेवावरच दुद्दैवाने पत्नीला मुखाग्नी देण्याची वेळ आली. या घटनेने संपूर्ण खुदीया गावावर शोककळा पसरली होती.