मुंबई – सचिन वाझे बडतर्फी आणि लाचखोरीच्या प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरमधील काटोलचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार असलेले देशमुख हे सध्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रिय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) रडारवर आहेत. या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांची चौकशी सुरु आहे. नुकतीच त्यांच्या विविध मालमत्तांवर या तपास यंत्रणांकडून धाडीही टाकण्यात आल्या होत्या.
असे असले तरी ट्वीटर आणि फेसबुकसह अन्य सोशल मिडीयामध्ये आजही देशमुख यांच्या प्रोफाईल पिक्चरवर महाराष्ट्र पोलिस दलाचा अधिकृत लोगो अर्थात बोधचिन्ह लावल्याचे दिसून येत आहे. देशमुख हे गृहमंत्री होते, त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता महाराष्ट्र पोलिस दलाशी त्यांचा काहीही संबंध नसताना, ते राज्य शासनाच्या गृहखात्याशीही संबंधित नसताना, ते पोलिस दलाचे अधिकृत बोधचिन्ह कोणत्या अधिकारात वापरत आहेत, याची विचारणा नेटकऱ्यांकडून होत आहे.
राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याही ही गोष्ट लक्षात कशी आलेली नाही आणि देशमुख यांना हे लोगो अजूनही वापरण्यास कुणी अनुमती दिली, याचा शोध घेतला जाण्याचीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन पदत्याग करावा लागल्यानंतर एका महत्त्वाच्या नेत्याने पोलिस दलाच्या लोगोचा दुरुपयोग केल्याबद्दल राज्य शासन काही कारवाई करणार की, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण याच सोशल मिडीया साईट्सवरुन देशमुख यांची अधिकृत विधाने प्रसिद्ध होत आहेत, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले आहे