मुंढवा – जलसंपदा आणि महापालिका यांच्यात पाण्यासंदर्भात 2000 मध्ये झालेल्या करार नुसार पुणे शहराचा पाणीपुरवठा आणि मुंढवा जॅकवेलमधून सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या साडेसहा टीएमसी पाणीसाठाचा हिशेब जलसंपदा विभागात महत्त्वाचा आहे. परंतु, मुंढव्याच्या जॅकवेलमधून जुन्या कालव्यात पाणी सोडण्यात येते का? सांडपाणी शुद्धीकरणाचा हा प्रकल्प सुरू तरी आहे का? असा प्रश्न जुन्या कालव्याची अवस्था पाहून पडू लागला आहे. सध्या, स्थितीत हा कालवा अतिशय कमी प्रवाहाने वाहताना दिसतो.
ग्रामीण भागातील शेतीसाठी प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने 100 कोटी रुपये खर्च करून मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची उभारणी केल्याचे तसेच या प्रकल्पातून 6.5 टीएमसी पाणी सिंचनासाठी महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले जाते. हे शुद्ध (?) केलेले पाणी हडपसर, महादेवनगर, फुरसुुंगी परिसरातून जुन्या कालव्याद्वारे दौंड तालुक्यापर्यंत जाते.
परंतु, सध्या, या कालव्यातून पाण्याचा प्रवाह कमी आहे. कालव्यात बऱ्याच ठिकाणी झाडझुडपं गवतच उगवलेले आहे. कालव्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. यामुळेही पाण्याचा प्रवाह कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळेच कालव्यात पाणी कमी असल्याने मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून पाणी खरेच सोडले जाते का? असा प्रश्नही नागरिकांसह शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.