पुणे/येरवडा- येथील पुणे महापालिकेचे भारतरत्न स्व.राजीव गांधी रुग्णालय महापालिकेनेच पूर्णक्षमतेने चालवावे, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे येरवडा नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याची दखल घेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत तात्काळ कार्यवाहीचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाची इमारत वापराविना पडून आहे. या रुग्णालयातील काही सुविधा खासगी यंत्रणेमार्फत दिल्या जातात. मात्र, याकडे देखील महापालिकेचे लक्ष नाही. करोना आजाराचे संकट लक्षात घेता गरीब व गरजू रुग्णांना उपचारांसाठी येथे परिसरातील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या तपासण्या, औषध उपचार, एक्स-रे, सिटीस्कॅन, शस्त्रक्रिया तसेच ऑक्सिजन बेडची व्यवस्था तात्काळ करण्याची मागणी आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ससून तसेच इतर रुग्णालयांवर येणारा रुग्णांचा अधिकचा भार कमी होऊ शकेल. तसेच, रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळू शकतील, ही बाबही आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानुसार राजीव गांधी रुग्णालय सुरू करण्याबाबत कार्यवाहीचे आदेश आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी समितीचे शैलेश राजगुरू, निखिल गायकवाड, रुपेश घोलप, धनंजय बाराथे, सुहास कांबळे तसेच राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी परेरा, अक्षता राजगुरू उपस्थित होते.