नवी दिल्ली : सामान्य मुंबईकरांना केंद्र सरकारने बुधवारी दिलासा दिला. समुद्राची पातळी वाढल्याने मुंबई बुडण्याचा कोणताही धोका नसल्याचे सरकारने बुधवारी राज्यसभेत स्पष्ट केले. भारतीय शास्त्रज्ञांवर तुम्ही विश्वास ठेवा. त्यांच्या अहवालाला जागतिक पातळीवर उच्च मानांकन मिळाले आहे, अशी विनंतीही सरकारने केली.
प्रश्नोत्तराच्या तासाला कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी हा गंभीर विषय उपस्थित केला. मुंबई बुडणार या छापून आलेल्या बातम्या बाहेरील देशांत घडलेल्या कोणत्या तरी घटनांवर विसंबून आहेत. आम्ही जे सांगतोय ते देशातील शास्त्रज्ञांच्या अहवालाच्या आधारे सांगत आहोत. त्यांनी पुरवलेल्या माहितीला जगात उच्च दर्जाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरण्याची गरज नाही. मंबईला कोणताही धोका होणार नाही, असे भूगर्भ शास्त्रज्ञ मंत्री हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले.
20140 ते 50 या काळात दरवर्षी एकदा तरी जलप्रलयासारखी मुसळधार वृष्टी होण्याचे कोणतेही संकेत मिळत नाहीत. दरवर्षी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर सागराची पातळी 0.74 एमएमने वाढत आहे. 2050 पर्यंत ती 3.33 सेंटीमिटर वाढण्याची शक्यता आहे. हे अनुमान सागरी माहिती सेवेच्या राष्ट्रीय केंद्रामार्फत दीर्घकाळ समुद्राच्या बदलातील नोंदींचा अभ्यास केल्यानंतर हे निष्कर्श काढण्यात आले आहेत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
या मुद्द्याचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न सरकार कडून केला जात असल्याची शंका उपस्थित करण्यात आली. त्यावेळी मंत्री म्हणाले, या माहितीच्या आधारे आपल्याला सुनामीची माहिती आधी मिळते. समुद्रातील वादळाच्या माहितीची भारत अन्य देशांशी देवाण घेवाण करतो. त्यामुळे आपल्या शास्त्रज्ञांना कमी लेखण्याची कोणतीही गरज नाही. आज जगात आपल्याला अधिकृतपणे प्रथम मानांकन मिळाले आहे.,