मुंबई – मुंबई क्रिकेट संघटनेची येत्या 20 तारखेला निवडणूक होत आहे. राज्याच्या राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्याशीच गाठ बांधल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यासाठी व क्रिकेट संघटनेतील मक्तेदारीसाठी वेगवेगळी गाठ बांधल्याचे दिसत आहे.
जे उमेदवार रिंगणात येण्यास इच्छुक होते त्यांनी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केले. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना यांचे नेते एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचे समोर आल्यामुळे ही निवडणूक राज्याच्या आगामी राजकारणाचेही चित्र स्पष्ट करणारी ठरेल असेच संकेत दिसत आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला व त्यावरून सध्या विविध चर्चा रंगत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा व संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्याच गटात शेलारही आहेत व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हे कार्यकारी सदस्य आणि मुंबई लीगच्या पदासाठी निवडणूक लढवणार आहेत.
पाटील पडले एकाकी
भारताचे माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष तसेच पक्के मुंबईकर संदीप पाटील यांनीही अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र, संघटनेत नव्याने तयार झालेली युती पाहता ते एकाकी पडल्याचेच चित्र दिसत आहे. खेळांच्या संघटनेवर खेळाडूचीच नियुक्ती व्हावी असा विचार अनेक संघटनांत यंदा दिसत आहे. मात्र, क्रिकेटमध्ये तरी अद्याप ते सातत्याने दिसलेले नाही. पाटील यांच्यामुळे हे चित्र दिसेल अशी अपेक्षा होती मात्र, ती देखील आता फोल ठरणार आहे.
माजी कसोटीपटू संदीप पाटील या गटातून अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या गटाकडून सर्व पदांसाठी अगोदरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये पारंपरिक बाळ महाडदळकर गटाचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. यंदा त्यांच्या गटाकडून सचिव, खजिनदार आणि कार्यकारी सदस्य पदासाठी चार अशा सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे यंदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विविध पदांसाठी मिळून 107 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आता अर्जांची छाननी होणार असून येता शुक्रवार उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, तेव्हा खरे चित्र स्पष्ट होणार आहे