केळघर -गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर आलेल्या निसर्ग वादळाच्या जिल्ह्यातही मोठा परिणाम झाला होता. वादळामुळे जावली व महाबळेश्वर तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या मुकवली माची येथील लोकांना गेल्या आठवडाभरापासून अंधारातच बसावे लागत आहे. तसेच वीजेअभावी पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे.
मुकवली माची येथील छोट्याश्या लोकवस्तीला वादळाने जोरदार तडाखा दिला असून या वस्तीतील चार लाईटचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना “कोणी वीज देता का, विज’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ही छोटीशी वस्ती जावळी व महाबळेश्वर तालुक्याच्या हद्दीवर असल्याने जावली व महाबळेश्वर येथील महावितरण कंपनीने टोलवाटोलवी करत असल्याने आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत.
सध्या पावसाचे दिवस असल्याने व शेतीच्या कामाची लगबग वकरोनाचे संकट यामध्ये येथील नागरिक आधीच त्रस्त असून येथील नागरिकांना महावितरण कंपनीने जावळी का महाबळेश्वर हद्दीचा वाद मिटवून ताबडतोब न्याय द्यावा व विजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.