सिंधुदुर्ग: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीवर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार नारायण राणे यांनी केला.
सरकारला खर्च करायचा असेल, तर पुरवण्या मागण्या मान्य करून घ्यायला पाहिजेत. त्यासाठी एक दिवासाचं अधिवेशन बोलावायला हवं, अशी मागणीदेखील त्यांनी केली. विरोधी पक्षाला सामोरं जायला जी ताकद लागते, ती सत्तारुढ पक्षामध्ये नसल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली.
फक्त फेरफटका मारून होत नाही, राज्य सरकारने “निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा, अशी मागणी करतानाच ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे, लोकल सुरू करून काय करणार? असा सवालही त्यांनी केला.
राणे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळ झाले, तेव्हा मी तिथेच होतो. मी नुकसान पाहिले आहे. राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही. रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना झालेली मदत तुटपुंजी आहे. आर्थिक स्थिती वाईट असली तरी सरकारने मदतीचा फेरविचार करावा. लोकांना जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सिंधुदुर्गाला 25 कोटींची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील 200 कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका. मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. फक्त फेरफटका मारून काही होत नाही, असा प्रहारही राणेंनी केला. केंद्राकडे आम्ही भरीव मदतीसाठी मागणी करू, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो होत नाही. लोकल सेवा सुरू करून काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली. राज्यात करोनाची रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. सरकारने कमी करून दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते उघडे पडतील.