सातारा -महागाईच्या काळामध्ये सातारा शहर व परिसरातील सुमारे 40 हजारांहून अधिक वीज ग्राहकांना महावितरणने दुहेरी शॉक दिला आहे. मासिक वीज बिलाबरोबर सुरक्षा अनामत रकमेसह बिल भरण्याचा मेसेज ग्राहकांपर्यंत पोहचल्याने हे कोणते बिल जनरेट झाले या संभ्रमामध्ये ग्राहक आहेत. महागाईचा मार सोसणाऱ्या सामान्य जनतेला या सुरक्षा ठेवीसाठी पुन्हा भुर्दंड सोसण्याची वेळ ओढवल्याने संतापाचे वातावरण आहे.
एकीकडे महागाईच्याच्या काळात ग्राहक कसेबसे वीज बिल भरत असताना आता सुरक्षा अनामत पाहून वीजग्राहक अवाक झाले आहेत. सातारा शहरामध्ये तब्बल 40 हजार अधिक वीज ग्राहक असून त्यांना यंदाच्या महिन्यात दोन बिले आल्याने सातारा येथील वीज वितरणच्या कार्यालयातील चौकशी कक्षामध्ये या दुहेरी बिलाची विचारणा होऊ लागली आहे.
सुरक्षा अनामतीचे हे बिल नियमानुसार असून ते वरूनच आले आहे असे सांगून कर्मचारी वेळ मारून येत आहेत. याविषयी महावितरणच्या सूत्रांना विचारले असता ते म्हणाले, “”एक एप्रिलपासून लागू झालेल्या वीज दरानुसार महावितरणकडून वीज बिलांची आकारणी करण्यात येत आहे. विनिमय क्रमांक 13 नुसार ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकांच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिले नसलेल्या ग्राहकांनी सुरक्षा ठेव दीडपट करण्याची तरतूद विद्युत नियामक आयोगाकडून करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार महावितरणकडून वीज ग्राहकांना संबंधित आवश्यक सुरक्षा ठेवून रकमेच्या फरकाची स्वतंत्र बिले दिली जात आहेत. पूर्वी महावितरण एक महिन्याचे बिल सुरक्षा ठेव म्हणून ठेवत होते.
मात्र, आता विद्युत नियामक आयोगाने त्या नियमात बदल केला आहे. सुरक्षा ठेव रक्कम वाढवण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून एक महिन्याऐवजी दोन महिन्यांचे बिल ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ही रक्कम ग्राहकांना भरावी लागणार असून आता आलेले बिल आणि पुढील महिन्यात येणारे बिल जास्त प्रमाणात येणार आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम जमा न केल्यास पुढील महिन्याच्या बिलात ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे.” सुरक्षा ठेव रक्कम कमी असल्यास एकाच बिलातून वसूल करण्यात येणार आहे. रक्कम जास्त असेल तर ती टप्प्याटप्प्याने वसूल करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, सातारकरांना या तांत्रिक बाबी सविस्तर स्वरूपाने सांगणे आणि सुरक्षा अनामत का घेतली जात आहे याचे तार्किक कारण कळवणे याचे कोणतेही सौजन्य महावितरणने दाखवले नाही.
कायदेशीर दाद मागणार ः सुनीता राजेघाटगे
महावितरण, महापारेषण या दोन्ही विभागांमध्ये समन्वय नसल्याने नक्की दुहेरी बिल का भरायचे याविषयी सातारकरांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. बारामती परिमंडळांतर्गत देणाऱ्या सातारा वीज वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी याबाबतचे प्रबोधन व माहिती सार्वजनिक माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. महागाईने सर्वसामान्य माणूस भरडला जात असताना सुरक्षा ठेवीचा हा दिलेला मार म्हणजे सातारकरांचा खिसा फाडण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष संतोष शेंडे यांनी दिली आहे. या सुरक्षा अनामतीच्या बिलाची सविस्तर माहिती घेऊन त्याविरोधात कायदेशीर दाद मागण्यात येईल, अशी प्रतिक्रिया ग्राहक संरक्षण पंचायतीच्या संघटक सुनीता राजेघाटगे यांनी दिली. या संदर्भामध्ये साताऱ्यातील विविध संघटना आंदोलनाच्या तयारीत असून दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनीही या विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.