Amit Shah: संसदेचे हिवाळी अधिवेशनदरम्यान जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेबाबत सुधारित विधेयकावरील चर्चेवरुन गदारोळ झाला. बुधवारी (६ डिसेंबर) सभागृहात हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावर आपले म्हणणे मांडताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत सभागृहात वक्तव्य केले होते. त्यामुळे काँग्रेस खासदारांशी त्यांचा वाद झाला. दरम्यान, जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांच्यासोबत खडाजंगी झाली.
सुधारित विधेयकात जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेबाबत संसदेत दोन दिवस चर्चा सुरू होती, ज्याला अमित शहा उत्तर देत होते. यादरम्यान मनीष तिवारी म्हणाले की, सुधारित विधेयकात राज्यांच्या विधानसभांची पुनर्रचनेबाबत याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यावर उत्तर देताना अमित शहा यांनी या विधेयकातील कलम वाचून दाखवले आणि मनीष तिवारी यांनी ते पूर्ण वाचले नसल्याचे सांगितले. यानंतर तिवारी उभे राहिले आणि बोलत राहिले, त्यानंतर शाह यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागितले.
नेमकं काय घडलं?
अमित शहा उत्तर देण्याचा प्रयत्न करत असताना मनीष तिवारी सतत बोलत होते, त्यानंतर अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे संरक्षण मागितले. शहा म्हणाले, “अध्यक्ष महोदय, मी असे बोलू शकत नाही. मला त्यांच्याकडून संरक्षण हवे आहे. कृपया व्यवस्था करून दया, जेणेकरून मी उत्तर देऊ शकेन. मी त्यांना असे उत्तर देऊ शकत नाही.” दरम्यान, संसदेत मनीष तिवारी बोलत होते त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांना गप्प करण्याचाही प्रयत्न करत होते.
दरम्यान, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने यांच्या विविधकामाचे कौतुक केले. याचवेळी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष केलं. पंडित नेहरूंच्या काळात झालेल्या 2 चुकांमुळे काश्मीरला पुढचे अनेक वर्ष अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या,’ असा दावा त्यांनी केला.
अमित शहा यांनी नेहरूंवर टीका करताच संसदेत उपस्थित असलेले काँग्रेस खासदार चांगलेच संतापले. त्यांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काहींनी अमित शहा यांच्या भाषणात देखील व्यत्यय आणला. त्यानंतर सभापती महोदय मला यांच्यापासून संरक्षण द्या, अशी मागणी अमित शहांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. तर यावेळी अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव अशी व्यक्ती आहे की, ज्यांनी काश्मीरमधील पीडितांचे अश्रू पुसण्याचे काम केले असल्याचे म्हणत त्यांचे कौतुक केले.