मुंबई – भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी संसदीय कार्य, रेल्वे आणि हाऊस समितीसह सर्व संसदीय समित्यांचे राजीनामे दिले आहेत. गोपाळ शेट्टी यांनी फेसबुक लाईव्हवरून तशी घोषणाच केली आहे.
गोपाळ शेट्टी यांनी आज फेसबुक लाईव्ह करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. संसदीय कार्य समिती, रेल्वे समिती आणि हाऊस समितीसह सर्व समित्यांचा आपण राजीनामा दिला आहे. तसेच केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे हे राजीनामे पाठविले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
मागच्या अनेक वर्षांपासून खासदार शेट्टी हे झोपडपट्टी पुनर्वसन आणि त्या ठिकाणी गोरगरिबांना पक्के घर लवकरात लवकर मिळावे यासाठी झटत आहेत. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नवीन संशोधित कायदा केला. परंतु आजपर्यंत या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन झालं नाही.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच डॉ. योगेश दुबेंमार्फत मानव अधिकार आयोगापर्यंत शेट्टी यांनी पाठपुरावा केला. मात्र, अजूनपर्यंत 2017च्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत.
तसेच या ठिकाणी पहिल्या माळ्यावर राहणाऱ्यांना सशुल्क घर मिळण्यासाठीही कोणते ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी केल्या, प्रशासनिक समित्याही नेमण्यात आल्या. पण कोणतीच कार्यवाही होत नसल्याने शेट्टी संतप्त झाले आहेत. त्यामुळेच या कामाला पुढील वेळ देण्यासाठी सर्व समित्यांचे राजीनामे दिले आहेत.