मुलगा झाला श्रावण बाळ; परभणी ते पंढरपूर व्हीलचेअरवर वारी
पुणे – कापरा आवाज.. शरीर थकलेले, अशा 85 वर्षांच्या मुक्ताबाई मुलाकडे पंढरीला पायवारी करण्याची इच्छा व्यक्त करतात. बाळा यंदा वारी चुक नये म्हणून मला घेऊन चल. आता वय खूप झालं आहे, असं म्हणून मुक्ताबाई नाईक यांनी मुलाकडे हट्ट केला. मुलानेदेखील तो पूर्ण केला. कित्येक वर्षे माझी आई वारी करत आहे. आम्हालासुद्धा पंढरपूरचा व्यापक सोहळा आईसोबत पाहण्याची संधी लाभली. आईने वारीचा हट्ट धरला नसता, तर आम्हाला इतक्या वर्ष आई वारी का करत आहे, हे समजले नसते. आईच आता आमची माऊली.. तिची सेवा हीच आमची पंढरी, असे सुपुत्र ज्ञानोबा नाईक सांगतात.
गोदावरी काठी असलेले रामपुरी बुद्रुक हे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेलं गाव. याच गावातून मुक्ताबाई गेली कित्येक वर्षे पंढरीची पायी वारी करत आहेत. आज त्यांचं कुटुंब त्यांच्यासमवेत माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे.
आळंदीहून निघालेले नाईक कुटुंब चर्चेत आले ते त्यांच्या आईमुळे. वयोवृद्ध आईला मुलगा व्हीलचेअरवर बसवून पायवारी करतोय.. तिची सेवा करतोय.. हे दृश्य हजारो पायी चालणाऱ्या वारकऱ्यांपेक्षा वेगळे ठरले. अनेक लोकांनी कौतुकदेखील केले. त्या माउलीचे आशीर्वाददेखील घेतले… हे सारे काही पाहण्यासारखे होते.
बरे झाले आजिवरी ।
नाही पडलो मृत्यूचे आहारी ।
वांचोन आलो एथवरी ।
उरले ते हरी तुम्हां समर्पण ।।
या उक्तीप्रमाणे घडत आहे.
वारकरी संप्रदायाचे विचार अंमलात आणणारा सुपुत्र ज्ञानोबा नाईक यांनी व्हीलचेअर हातात घेऊन देहू ते पुणे हा पहिला वारी मुक्काम यशस्वी केला. आज ते सासवडकडे रवाना होत आहेत. माउलींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास ज्ञानोबा यांच्या बोलण्यात होता. त्यामुळे पंढरपूरला निसंकोच आईला घेऊन पोहोचू, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
रामपुरी बुद्रुक या गावातील अनेक वारकरी शेकडो वर्षांपासून पंढरीला जातात. येथील मुक्ताबाई नाईक या लहानपणापासून पंढरपूरला वारीला जात असत. पतीचे निधन झाल्यानंतरही त्या एकट्या वारीला जात असत. याची देही, याची डोळा! पाहू सुखाचा सोहळा!! या उक्तीप्रमाणे आपण वारीला जावं असं मुक्ताबाईंना मनापासून वाटायचं. आईच्या इच्छेखातर मुलाने व्हीलचेअरचा पर्याय निवडला आणि सुरू झाला वारीचा प्रवास.
खरा वारीचा आनंद सगळ्यांच्या मेळ्यात मिळतो. आम्ही कुटुंब आईसोबत पहिल्यांदाच वारी करतोय. आळंदी ते पुणे या प्रवासात साधुसंतांचे दर्शन झाले. पुण्यातील लोकांनी भरभरून प्रेम दिले. त्याची परत फेड करणे अशक्यच आहे. किंवा काही काही ऋण न फेडण्यासारखेच असतात. आई-वडिलांची सेवा म्हणजेच खरी वारी.
– ज्ञानोबा सोपानराव नाईक
वारकरी, मुक्ताबाई यांचे पुत्र