अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे केले सुरू
राजेगाव- येथे गेल्या तीन दिवसापासून पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान घातला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकांची पेरणी केलेली तर काही काढणीला आलेल्या पिकांचे या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
राजेगाव (ता. दौंड) येथील परिसरात बहुतेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे कांदा, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी गावतील महसूल, कृषी कर्मचारी हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकांची पहाणी करून पंचनामे करत आहेत. राजेगावच्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांच्या शेतातून अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. या सर्व पिकांचे पंचनामे करण्यासाठी मंडल अधिकारी मंगेश नेवसे,कृषी सहाय्यक शरद काळे, तलाठी दीपक पांढरपट्टे, कोतवाल अशोक भोसले, शेतकरी संतोष जगताप, रंगनाथ ढवळे उपस्थित होते. यावेळी नेवसे म्हणाले की, सर्व शेतकऱ्याचे पंचनामे पाहणी करूनच केले जातील .शेतकऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना या कामात मदत करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.