नवी दिल्ली – खराब हवामानामुळे तसेच दाट धुक्याच्या कारणामुळे भारतीय रेल्वेन आज एक हजारापेक्षाही अधिक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार एकूण 1 हजार 30 गाड्या पुर्ण रद्द करण्यात आल्या असून 24 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, नवी दिल्ली, तामिळनाडु, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार आणि झारखंड या राज्यांतून जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने वेबसाईट आणि अन्य क्रमाकांवर या गाड्यांच्या स्थितीची माहिती दिली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांना दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध होणे अवघड असल्याने प्रवाशांपुढे मोठाच प्रश्न निर्माण झाला होता.