नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे दिवसागणिक नोंद होणाऱ्या करोनाबाधितांची संख्याचा आलेख देखील झपाट्याने उंचावत आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८६ हजार ०५२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
देशात आढळून आलेल्या उच्चांकी संख्येमुळे देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ५८ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे देशात एका दिवसात विक्रमी चाचण्यांचीही नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८६ हजार ०५२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून १ हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील करोनाबाधितांच्या एकून संख्येने ५८ लाख १८ हजार ५७१ वर पोहोचली आहे.
देशात सध्या ९ लाख ७० हजार ११६ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४७ लाख ५६ हजार १६५ जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ९२ हजार २९० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.