मुंबई, – नैऋत्य मान्सून अखेर आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने चार दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार ते 5 दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
नैऋत्य मान्सूनचे आज महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूने व्यापाला आहे. संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचा काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच संपूर्ण विदर्भात 15 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटांसह मान्सूनपूर्व वादळी पावसाची अधिक शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढील दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र त्याआधीच आज मान्सून राज्यात दाखल झाला आहे. यावेळी ढगाळ वातावरण असेल. तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तळकोकणासह अनेक ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमार किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे. या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू राहिल.
मान्सूनसाठी निर्माण झालेल्या पोषक स्थितीमुळे मान्सून पुढील दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र दोन दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे.