नवी दिल्ली : संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. दरम्यान, हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत रविवारच्या सर्वपक्षीय बैठकीत मिळाले होते. महागाई, अग्निपथ योजना आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर या विषयावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची चिन्ह आहेत. कारण हे सर्व चर्चेला घेण्याची मागणी विरोधकांनी बैठकीत केली. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित होते. पंतप्रधानांची ही वर्तणूक ‘असंसदीय’ नाही का, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला. संसदेचे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 18 बैठका होणार असून 24 विधेयकं मांडली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने रविवारी 17 जुलै रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी सुमारे 25 मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली. 12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही महत्त्वाच्या घटनात्मक पदांसाठीही निवडणुका होणार आहेत.
रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत 36 पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजप , काँग्रेस , टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, सपा, बसपा, आरजेडी इत्यादी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, विरोधकांकडून 25 मुद्द्यांवर चर्चेची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 13 मुद्दे त्यांच्या पक्षानं मांडले आहेत.
विरोधकांनी ज्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली आहे, त्यात महागाई, अग्निपथ योजना, बेरोजगारी, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि घसरत चाललेल्या रुपयाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेची स्थिती यासारख्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. सर्वपक्षीय बैठक सुरू असताना काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्वीट करून वाद सुरु केला. बैठकीत जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या गैरहजेरीवरून सरकारवर निशाणा साधत हे असंसदीय नाही का, असा सवाल केला. बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, मनमोहन सिंह पंतप्रधान असताना किती सर्वपक्षीय बैठकांना गेले होते असा सवाल करत प्रत्युत्तर दिले.