बेंगळुरू -आयपीएल स्पर्धेत अनकॅप खेळाडूंवर बोली लावताना जास्तीत जास्त एक कोटी रुपयांची मर्यादा हवी. अल्पावधीत मिळालेले करोडो रुपये खेळाडूंसाठी घातक ठरतात. यातून खेळाडू अतीपैसा हाती असल्याने भरकटतात, असे परखड मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
आयपीएल स्पर्धेच्या नुकत्याच झालेल्या मेगा लिलावात अनेक अनकॅप खेळाडूंवर प्रचंड रकमेची बोली लागली. अनेक संघांनी मोठी रक्कम खर्च करत नवोदित खेळाडूंना मालामाल केले. अनेक खेळाडू एका रात्रीत करोडपती झाले. यापुढे लिलावात अनकॅप खेळाडूंवर बोली लावण्याची मर्यादा 1 कोटीपर्यंतच असावी.
पोटशूळ कशासाठी
गावसकर यांनी केलेल्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. इतर खेळाडूंना मिळत असलेला पैसा पाहून गावसकर यांना पोटदुखी का होत आहे, अशा शब्दांत नेटिझन्सनी गावसकर यांना फटकारले आहे.
एका रात्रीत मिळणारी मोठी रक्कम युवा खेळाडूंच्या भविष्यावर परिणाम करणारी आहे. त्यामुळे क्षमता असलेले खेळाडू भरकटतात, असेही गावसकर म्हणाले. मेगा लिलावात डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत 19 वर्षांखालील खेळाडूंवर कोट्यवधीची बोली लागली. अल्पावधीत मिळालेल्या भरमसाठ पैशामुळे अनेक खेळाडू भरकटतात. त्यांचा खेळावरील लक्ष कमी होते. त्यामुळे अनकॅप खेळाडूंवर बोली लावण्यासाठी काही नियम तयार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.