हैदराबाद – भारतीय क्रिकेट संघाचा एकेकाळचा यशस्वी कर्णधार आणि कसोटी पदार्पणातच सलग तीन कसोटीत तीन शतकी खेळी करणारा महंमद अजहरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात केलेल्या सर्वात वेगवान शतकी खेळीला उजाळा दिला.
त्याची खांदे उडवायची स्टाइल, त्याची अडखळत बोलण्याची शैली, ऑफचा चेंडू मनगटी खेळाच्या जोरावर ऑनला मारण्याची हतोटी आणि दिग्गज खेळाडू संघात असूनही त्याने केलेली संघबांधणी यांमुळे अजहर लोकांच्या गळ्यातील ताइत बनला होता. मात्र, 1999-2000 साली मॅच फिक्सिंगमध्ये नाव आले आणि शंभरावा कसोटी सामना खेळण्याचे त्याचे स्वप्न भंगले. त्याला संघातून काढण्यात आले त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चोकशी झाली व त्याच्यावर तहहयात क्रिकेट बंदी लावली गेली. अर्थात त्याला काही वर्षांनी क्लीनचीट मिळाली व त्याची आता राजकीय कारकीर्द देखील सुरु झाली.
मात्र, 1980 च्या दशकात त्याच्या मनगटी फलंदाजीचे गारुड केवळ भारतातच नाही तर जागतिक क्रिकेटवर होते हे कोणीच नाकारणार नाही. त्या काळी आक्रमक फलंदाजी किंवा कमी चेंडूतील मोठी खेळी आश्चर्य वाटायचे त्याकाळी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या चक्क सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत केवळ 61 चेंडूत शतक फटकावले होते. त्यावेळी संपूर्ण जागतिक क्रिकेटला आश्चर्य वाटणारी ही कामगिरी होती. नंतर अनेक फलंदाजांनी त्यापेक्षाही कमी चेंडूत शतके फटकावली पण त्यावेळी शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध फलंदाजीलाच खरे क्रिकेट मानले जायचे त्यावेळी हा अजहरचा चमत्कारच ठरला होता.
मी जेव्हा खेळपट्टीवर आलो तेव्हा पहिला चेंडू खेळल्यावरच मला समजले की खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. त्यामुळे मी माझा नैसर्गिक खेळ करण्याचे ठरविले आणि नशिबानेही साथ दिली. दिल्लीकर अजय शर्माने मला योग्य साथ देत मलाच जास्त स्ट्राइक दिला त्यामुळेच ही खेळी साकार करता आली. ही खेळी मी कधीच विसरु शकत नाही, अशा शब्दात अजहरने आपल्या आठवणींना उजाळा दिला.