मुंबई : देशव्यापी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) राबवण्याच्या मुद्द्यावर मंत्रीमंडळात चर्चा झाली नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाक्य ऐकून मला आश्चर्य वाटले, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
देशभरात एनआरसी राबवण्याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेतील भाषणात सांगितले होते. अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेतही ते सांगितले होते. त्यामुळे रामलीला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान ऐकून मला आश्चर्य वाटले, असे पवार पत्रकारांना म्हणाले.
जेव्हा महत्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला जातो तेंव्हा सरकारच्या पातळीवर त्याची चर्चा केली जाते. त्याशिवाय अशी धोरणे देशासमोर येत नाहीत. दुसरे म्हणजे देशाचे गृहमंत्री राज्यसभेत देशव्यापी एनआरसी राबवणार असल्याचे सांगतात. राष्ट्रपतीही ते संसदेत सांगतात. राष्ट्रपती संसदेत सरकारची भूमिका मांडत असतात. तरीही ते म्हणतात, मंत्रीमंडळात याबाबत चर्चा झाली नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
प्रत्येक आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. या परिस्थितीवररून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी असे मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित केले जातात आणि अशी भाषणे केली जातात. याशिवाय त्यात वेगळे काही नाही असे सांगून पवार म्हणाले, मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची निट काळजी घेतली नाही.
भाजपाने झारखंडमध्ये पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. मात्र, तरीही तेथील जनतेने त्यांना नाकारले. तेथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस यांना सरकार स्थापन करण्याची संधी दिली. झराखंडची स्थिती अन्य राज्यांपेक्षा वेगळी आहे. हे आदिवासीबहुल राज्य आहे. गरीबी अधिक आहे. अशा स्थितीत भाजपाने पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने भाजपला स्वीकारले नाही, याचा मला आनंद आहे. त्यासाठी मी झारखंडच्या जनतेचे आभार मानतो.
विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तेथील जनतेचा भाजपा सरकारवर विश्वास राहिला नाही, असे तेथील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला सांगितले आहे. का आणि एनआरसी यामुळे तेथील नागरिकांच्या मनात भीती बसली होती. त्याचा रोष या निकालातून व्यक्त झाला. छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रापाठोपाठ पाचव्या राज्यात भाजपाचा पराभव झाला. ही घसरण रोखणे अशक्य असते, असेही ते म्हणाले.