सातारा -पेट्रोल, डीझेल, गॅस दरवाढीमुळे झालेली जीवनावश्यक वस्तूंची महागाई, मूलभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “बुलडोझर नीती’ राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे. ही नीती सार्वजनिक व्यवस्था उद्ध्वस्त करणारी आहे, अशी प्रखर टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य व माजी खासदार वृंदा करात यांनी केली.
जनवादी महिला संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी त्या साताऱ्यात आल्या होत्या. त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. माकपच्या राज्य सरचिटणीस आनंदी अवघडे व जनरल सेक्रेटरी मरियम बुटवाला उपस्थित होत्या. वृंदा करात म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे शासन आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहे. भाजपने व्यक्तिपूजेचे अवडंबर माजवत देशात वाढलेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या आठ वर्षांत भांडवलशाही अर्थव्यवस्था प्रबळ झाली आहे,
तर दुसरीकडे देशातील 61 टक्के जनतेचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपयांच्या आत राहिले आहे. तब्बल सहा कोटी तरुणांना रोजगार गमवावा लागला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे; तरीसुद्धा प्रत्येक प्रार्थनास्थळामध्ये शिवपिंड शोधण्याचा भाजपचा उद्योग सुरू आहे. देशात जातनिहाय जनगणना मोदी सरकार करत नाही. सामाजिक विषमतेची दरी रुंदावल्याचे सत्य जनतेसमोर येऊ नये, म्हणून चुकीचा अजेंडा जाणीवपूर्वक राबवला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने सुरू केलेले राजकीय व धार्मिक ध्रुवीकरण देशाची अर्थव्यवस्था, सामाजिक, राजकीय रचना धोक्यात आणणारे आहे. ते रोखण्यासाठी सर्वसामान्यांनी हिमतीने पुढे यावे. ईडी, सीबीआयचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. या यंत्रणांची स्वायत्तता गमावण्याची भीती आहे.
मरियम बूटवाला म्हणाल्या, महाराष्ट्रात रेशनिंग व्यवस्था मोडकळीस आणण्याचा महाविकास आघाडीचा डाव असून, सर्वसामान्यांना दोन वेळचे अन्नही मिळेनासे झाले आहे. दारिद्य्ररेषेखालील यादीमध्ये भलत्याच लोकांची नावे आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व श्रमजीवी महिला वर्ग संकटात सापडला आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत राज्यातून व देशभरातून 30 लाख श्रमजीवी महिलांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे. साताऱ्यातही श्रमजीवी महिलांचे संघटन करून मोठे आंदोलन उभे करण्यात येणार आहे.