सोनई -औरंगाबाद – नगर महामार्गालगत सुरू असलेल्या सीएनजी पाईपलाईन कामादरम्यान पाटचाऱ्या उद्धवस्त झाल्या आहेत.पाटपाण्याच्या आवर्तनापासून वंचित राहिल्यामुळे शेकडो एकरवरील पिके जळून झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
सीएनजी पाईपलाईन कामामुळे पाटपाण्यापासून वंचित राहून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झालेल्या पिडीत शेतकऱ्यांची बाभुळवेढा येथे बद्रीनाथ चिंधे यांच्या वस्तीवर नुकतीच बैठक झाली. यासंदर्भात माहिती देताना चिंधे म्हणाले, कल्पतरु प्रायव्हेट लिमिटेड या खासगी ठेकेदार कंपनीमार्फत नगर- औरंगाबाद महामार्गालगत सुरु असलेले सीएनजी पाईपलाईनचे काम पूर्णपणे बेकायदेशीरपणे आहे. संबंधितांनी या पाईपलाईनच्या उत्खननासाठी कुठल्याही परवानग्या घेतलेल्या नसून नियमाप्रमाणे काम केले जात नसल्याने भविष्यात एखादी दुर्घटना झाल्यास गावेच्या गावे उद्धवस्त होण्याचा धोका आहे.
या कंपनीच्या कामामुळे उस्थळ, बाभुळवेढा परिसरातील पाटचाऱ्यांचे नुकसान झाले. त्याचा जवळपास परिसरातील शेकडो एकर शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी पाटचाऱ्यांच्या नुकसानीबाबत संबंधितांना कल्पना देऊन पाटपाणी आवर्तनापूर्वी चाऱ्या दुरुस्त करण्याची विनंती केली. त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे पाटपाण्यापासून वंचित राहून उभी पिके जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे रितसर पंचनामे करून या कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली.
सीएनजी पाईपलाईन कामामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या मागणीस शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, शिवसंग्राम पक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जाहीर पाठींबा दिला असून तीव्र लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, गोरक्षनाथ साळुंके, आम आदमी पक्षाचे प्रवीण तिरोडकर, शिवसंग्राम पक्षाचे सोपान रावडे, मनसेनेच्या मिराताई गुंजाळ तसेच जयसिंग गायकवाड, संतोष काकडे, संभाजी कोतकर, अशोक शेरकर, नितीन धानापुने, राजेंद्र गायकवाड, नंदराज शेळके, सुरेश सुकाळकर, संजय शेळके, ऋषिकेश कोतकर, राजेंद्र शेळके, दादासाहेब शेळके आदींसह शेतकरी उपस्थित होते.