संदीप राक्षे
सातारा – शहराचा मुख्य भाग असलेल्या ऐतिहासिक राजवाडा परिसरातही वाहने पार्किंगचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. फळविक्रेत्यांसाठी बांधलेल्या फ्रूट मार्केट ऐवजी फलविक्रेत्यांनी ऐतिहासिक राजवाड्याला गराडा घातल्याने परिसरात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणेने याकडे लक्ष दिले तर पार्किंगसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल आणि वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
सातारा नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेअंतर्गत भवानी पेठेमध्ये दीड कोटी रुपये खर्च करून सुसज्ज फ्रुट मार्केट बांधले. मात्र, दुसऱ्या मजल्यावर ग्राहक येणार नाही ही पळवाट शोधून सातारा शहरातील फळ विक्रेत्यांनी ऐतिहासिक राजवाड्याच्या फुटपाथवर तळ दिला आहे. त्यामुळे ऐतिहासिक राजवाडा आणि परिसराची रया गेली असून अनेक अतिक्रमणांमुळे परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे.
राजवाड्यासमोरील अजिंक्य गणेश मंडळाजवळ रस्त्यावरच फळ विक्रेत्यांच्या गाड्या उभ्या असतात. येथील वाहतुकीचे त्रांगडे चांदणी चौक व राजवाडा बस स्थानकापर्यंत अडचणीचे ठरले आहे. सध्या बसस्थानकामध्ये एसटी बसची वर्दळ सुरू झाली असताना चांदणी चौकातच भाजी विक्रेत्यांची गर्दी सुरू झाली आहे. त्यामुळे राजवाडा परिसर सुरळीत वाहतुकीसाठी डेंजर झोन ठरला आहे.
वास्तविकरित्या राजवाडा परिसरातील चौपाटी आणि फळविक्रेते यांची अन्यत्र सोय करून राजवाडालगतचा फुटपाथ पार्किंगसाठी तर मोकळी जागा अन्य कोणत्याही कारणासाठी सहज उपयोगात आणता येईल. गोलबाग येथील रिक्षा स्टॉप अन्यत्र हलवून चांदणी चौक ते जुने ट्रान्सपोर्ट कार्यालय हा संपूर्ण परिसर राजवाड्याच्या सुशोभीकरणासाठी वापरता येणे शक्य आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, फळविक्रेत्यांनी रोजीरोटीचा केलेला भावनिक प्रश्न, टपऱ्यांच्या मागे दडलेले अर्थकारण यामुळे मूळ कारवाईला होणारा विरोध आणि राजकीय दबावाखाली वावरणारे पालिकेचे कर्मचारी. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक वास्तू परिसरातील वाहतुकीचे आणि अतिक्रमण हटवण्याचे नियोजन कोलमडून पडले आहे. व्यापारी संकुलाची पार्किंग स्थळेसुद्धा व्यावसायिक करण्याची संधी येथील विक्रेते सोडत नाहीत.
बारा वर्षापूर्वी भवानी पेठेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेअंतर्गत तीन मजली भाजी मंडई आणि फ्रुट मार्केट तत्कालीन नगराध्यक्ष सुजाता राजेमहाडिक यांच्या कार्यकाळात उभारण्यात आले. मात्र, भाजी मंडई वगळता या इमारतीचा पार्किंग तळ आणि दुसरा मधला आजही धूळखात पडले आहेत. मंडईतील 52 पैकी केवळ 30 कट्ट्यांचा लिलाव झाला आहे.
बाकी सर्व विक्रेते मंडळी कट्टे सोडून मंगळवार तळे रस्त्यावर पथारी मांडून बसले आहेत. त्यामुळे आधीच बेशिस्तपणा त्यात ठोस आणि धडक कारवाईचा अभाव यामुळे व नगरपालिका आणि भाजी विक्रेते यांच्यातील विसंवादामुळेच राजवाडा परिसरही अनेक अतिक्रमणांचे केंद्र बनला आहे. येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यानाच्या लगतच पालिकेच्या फुटपाथवर बेकायदेशीररित्या तब्बल 22 ते 23 दुकाने भाड्याने दिली गेली आहेत. यांसह या परिसरात कारवाई होत नसल्यामुळे पार्किंगसह वाहतुकीचा प्रश्न चिघळत चालला आहे.