कोलकाता – केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरूवातीला उत्तर भारतात सुरू झालेल्या युवकांच्या आंदोलनाचे लोण आता पश्चिम बंगाल मध्येही पोहचले आहे. तेथे युवकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे 24 परगणा जिल्ह्यातील सिल्ढाह-बराकपोरे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
आज सकाळी तेथे युवकांच्या एका गटाने ही वाहतूक अडवली. तेथील रस्त्यावरील वाहनांची वाहतूकही या आंदोलनामुळे ठप्प झाली होती. आम्ही लष्कर भरतीसाठी अनेक वर्ष मेहनत करीत आहोत. पण सरकारने आता पुर्ण वेळ लष्कर भरतीच बंद करून त्याजागी 4 वर्षांची अग्निपथ योजना आणली आहे, त्यामुळे आमचे भविष्यच धोक्यात आले आहे.
त्यामुळे सरकारने ही योजना त्वरीत रद्द करून पुर्वी प्रमाणेच जवान भरती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रेल्वे मार्गावरून हटवल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुक पुर्ववत झाली.