नवी दिल्ली – पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्ह्यातील लष्कराच्या दोन मदतनीसांची हत्या करून त्यांचे शिरच धडावेगळे करण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. त्या प्रकारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मौन बाळगणेच पंसत केले आहे असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. हे मौन त्यांनी का बाळगले आहे असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी उपस्थित केला आहे.
पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमने म्हणजेच बॅटने हा हल्ला करून या दोघांची हत्या केली आहे. त्यांनी या दोन भारतीयांचा शिरच्छेदही केला आहे. या कृत्याबद्दल पाकिस्तानला खडसाऊन जाब विचारण्याची गरज असताना मोदी, शहा हे मौन बाळगून आहेत असे ते म्हणाले. एक सर के बदले दस सर काटेंगे असा पाकिस्तानला इशारा देणारे पंतप्रधान मोदी पाकिस्तानला आता कधी चोख प्रत्युत्तर देणार आहेत असा सवालही त्यांनी केला आहे.