मुंबई : भाजप आणि मनसे एकत्र आले तर भाजपचे नुकसानच होईल, असे मत आयपीआयचे अध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
यावेळी रामदास आठवले यांनी भाजप-मनसे युतीवर भाष्य केले.
रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे भाजपसोबत येणे हे भाजपसाठी फायद्याचे ठरणार नाही आणि जर राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेत बदल केला तर त्यात त्यांचे (मनसे) नुकसान आहे.
त्यामुळे भाजप-मनसे युती होऊ शकत नाही. शिवसेनेने जरी आज भाजपसोबत नसेल, तरी आरपीआय मात्र भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीससोबत ताकदिने उभी आहे. दलितांची मतं मिळवण्यासाठी आरपीआयचे भाजपला समर्थन आहे. त्यामुळे राज ठाकरेची काही गरज नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, राज्यातील राजकारणाला दररोज नवीन वळण येत असून भाजप-मनसे युती झाल्यास त्याचा भाजपच्या अन्य मित्रपक्षांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच रामदास आठवले यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केल्याने मनसेसोबत युती केल्यास भविष्यात आरपीआयही भाजपपासून दुरावू शकतो.