त्यांचे व्यक्ती म्हणून नव्हे तर विषय केंद्रीत विश्लेषण गरजेचे अभिषेक मनु सिंघवी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली: मोदींना राक्षस ठरवून भागणार नाही असे जे प्रतिपादन कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले होते त्या वक्तव्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की व्यक्तीगत पातळीवर आम्ही त्यांना राक्षस म्हणून कधीच संबोधलेले नाही. एक व्यक्ती म्हणून नव्हे तर त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांच्या पातळीवर त्यांचे विश्लेषण होण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.
जयराम रमेश यांनी काल एका पुस्तक प्रकाशनात बोलताना मोदींना कायम राक्षस ठरवण्याने काहीही साध्य होणार नाही असे विधान केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना सिंघवी यांनी म्हटले आहे की, मोदींना राक्षस ठरवणे हे चुकीचे आहे असे आम्ही कायमच म्हणत आलो आहोत. कोणत्याही सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार त्या सरकारचे विश्लेषण करण्याची गरज आहे. व्यक्ती म्हणून त्यांचे विश्लेषण करण्याची गरज नाही. कोणतही कृती नेहमी चांगली, वाईट, किंवा वेगळ्यास्वरूपाची असते.