पारंपरिक शेती बदलून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रक्रिया उद्योग करून शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जिगरबाज शेतकरी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याचा नावलौकिक आहे. कृषिक्षेत्राला वाव आहे, हे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ओळखले असल्याने, ते निष्ठेने शेती करीत आहेत, याचा जिल्ह्यातील बळीराजाला सार्थ अभिमान आहे. शेतीत काबाडकष्ट करणाऱ्या जिल्ह्यातील पोशिंद्याला कृषी दिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव फुलसिंग नाईक यांचा वाढदिवस. दि. 1 जुलै रोजी आहे. राज्य शासनाने 1 जुलै हा कृषिदिन म्हणून जाहीर केलेला आहे. या दिनाचे औचित्य साधून राज्य शासन कृषिविषयक विविध पुरस्कार देत असते. याशिवाय कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांकडून पुरस्कार वितरण व कृषी मेळावे घेऊन जनजागृती केली जाते. शेती, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक व साहित्यविषयी उपक्रम पुणे जिल्ह्यात नित्यनेमाने राबविले जातात.
पुणे जिल्ह्यात सर्व प्रकारची शेती केली जाते. यामध्ये ऊस, कांदा, डाळींब, सीताफळ, अंजिर, द्राक्षं याचे मुबलक क्षेत्र आहे. विशेषत: उसासाठी बारामती, इंदापूर, दौंड हे तीन तालुके आघाडीवर आहेत. कांदा उत्पादनासाठी शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड, पुरंदर या तालुक्यांचा समावेश होतो. भाजीपाला प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पिकतो. याशिवाय भात पिकविण्याचे तालुके म्हणून पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात मावळ, भोर, वेल्हे या तालुक्यांचा समावेश आहे.
भौगोलिकदृष्ट्या पश्चिम पट्ट्यात डोंगर उतरावरील शेती प्रसिद्ध आहे. नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी, पानशेत, वरसगांव, खडकवासला, टेमघर या धरणांबरोबरच घोड प्रकल्पांचा समावेश पश्चिम भागात आहे. पश्चिम भागात प्रचंड पाऊस पडतो. त्यावरच पूर्व भागातील शेती फुलवली जाते. ज्वारी, गहू, बाजरी, हरभरा, भुईमूग आदी पिकांबरोबर भाजीपालाही पिकवला जातो. पुणे व मुंबई शहराजवळ असल्याने हा भाजीपाला व फळे घेऊन जाणे सोयीचे आहे.
कृषी महाविद्यालयांचे योगदान…
पुणे शहरात वर्ष 1907 मध्ये ब्रिटिशांनी कृषी महाविद्यालय सुरू केले होते. कृषी पदवीधर झाल्यावर तरुणांनी स्वतः शेती करावी, इतरांना मार्गदर्शन करावे, अशी शासनाची अपेक्षा होती. परंतु कृषी पदवीधरांची संख्या कमी असल्याने न परवडणारी शेती करण्यापेक्षा प्रशासकीय सेवा, प्रकिया, उद्योग, रासायनिक खतांचे कारखाने, बी-बियाणे उत्पादने यासारख्या क्षेत्रात कृषी पदवीधर सहभागी झाले. कृषी विद्यालय स्थापनेचा मूळ हेतू बाजूला पडला. शिकलेला तरूण शेतीत असल्याशिवाय शेतीची प्रगती होणार नाही, हे सूत्र माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी स्वीकारले. माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलाला राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमले. (वर्ष 2005 ते 2013). विनाअनुदानित तत्वावर नवीन कृषी महाविद्यालये सुरू केली. त्याचा परिणाम असा झाला की, आता दरवर्षी किमान 15 हजार कृषी पदवीधर निर्माण होत आहेत. अशा कृषी पदवीधरांची मोठी संख्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे.
पुणे येथील कृषी महाविद्यालयाबरोबरच बारामती, आंबी (ता. मावळ) येथील कृषी महाविद्यालय व लोणी काळभोर येथील एमआयटी कृषी पणन महाविद्यालय यामधून दरवर्षी शेकडो तरुण उत्तीर्णशरदराव पवारसाहेब केंद्रीय
कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी बागवानी मंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आदी संस्थाना बळ दिले. त्यामधून ठिबक सिंचन तुषार सिंचन, शीतगृह, प्रकिया उद्योग, फळांची निर्यात आदी बाबींमुळे शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले. कृषी पदवीधर अथवा इतर शाखांचा पदवीधर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागले. यांत्रिकीकरणाचा लाभ शेतकरी बांधवांना झाला. कृषिविषयक नवीन जातीच्या वाणांचा वापर केल्यामुळे उत्पादनही वाढले.
ऊसाची 86032 व 0265 ही जात, याशिवाय डाळींबाची भगवा जात. गहू फुले समाधान, भाजीपाल्याच्या विविध जाती वापरात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारले. तसेच गावाच्या अर्थकारणाला दिशा मिळाली. जिल्ह्यातील ही अर्थकारणाची नांदी राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरत आहे.
पुरंदर तालुका म्हणजे फलोत्पादनातला “कॅलीफोर्निया’ समजला जातो. मी कृषी परिषदेचा उपाध्यक्ष असताना विशेषत: अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राची जाधववाडी येथे स्थापना करण्यात आली.
पुरंदर तालुक्यात सीताफळाला यापूर्वी दुय्यम स्थान होते. या संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांनी सीताफळ व अंजिराची अधिक लागवड केली. त्यामुळे प्रकिया उद्योगाची क्रांती झाली. सीताफळाचा किमान 400 ते 500 टन पल्प निर्माण होऊ लागला. सीताफळापासून बासुंदी, मिल्कशेक, रबडी, कॅन्डी आदी उपपदार्थ बाजारात येऊ लागले.