आधुनिक भगीरथ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 136वी जयंती. कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि कार्याचे केलेले चिंतन…
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील वारणेच्या काठी वसलेल्या कुंभोज या छोट्याशा गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. कर्मवीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडब्रिदी गावचे. कर्मवीरांचे पूर्वज नशीब आजमवण्यासाठी महाराष्ट्रात आले व ऐतवडे बुद्रुक, जि. सांगली येथे स्थिरावले.
कर्मवीरांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई, तर पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे वडील रोड कारकून म्हणून नोकरीस होते. त्यामुळे त्यांचा सातारा जिल्ह्यात नोकरीतील बदलीच्या निमित्ताने सतत प्रवास होई. रोड कारकून म्हणून त्यांच्या वडिलांचा तळागाळातील लोकांशी संबंध येत असे. त्या लोकांची गरिबी व हालअपेष्टा पाहून बालवयातील भाऊरावचे मन गहिवरून येई.
कर्मवीरांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटा व पुढील विद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमध्ये 1902 ते 1907 या काळात झाले. शाळेतील पहिल्याच दिवशी त्यांचे बाह्यरूप पाहून विद्यार्थी त्यांना हसले होते. ते कुस्ती, मल्लखांब, पोहणे यात पटाईत होते. ते इंग्रजी सहावी शिकले. कोल्हापुरात असताना भाऊराव कोल्हापूर येथील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये राहात असत. ही बोर्डिंग 1905 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली होती. त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. त्यातून त्यांची वैचारिक जडणघडण झाली.
अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, कामगारांचा छळ आणि आर्थिक विषमता या विषयांवर ते अत्यंत आक्रमकपणे बोलायचे. अन्यायाची प्रचंड चीड, खरे तेच बोलणार, सत्य तेच सांगणार हे तत्त्व त्यांच्यात बालपणापासून भिनलेले होते. कोल्हापुरात शिक्षण घेत असल्यापासूनच महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी यांच्यासारख्या महान समाजधुरिणांच्या विचारांचा अण्णांवर पगडा पडला होता. स्वातंत्र्यलढ्यात ते महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झाले होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनाही ते भेटले.
शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे अशी त्यांची खात्री पटली. शिक्षणाच्या अभावामुळेच आपली पीछेहाट झाली आहे याची त्यांना अगदी तरुण वयातच जाणीव झाली. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी माधव अण्णा मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींच्या साथीने 1909 मध्ये वाळवे तालुक्यात “दूधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन करून यांच्या साथीने सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केले. भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यास येथूनच प्रारंभ झाला.
रयत शिक्षण संस्थेचे बीज खऱ्या अर्थाने येथेच रोवले गेले. त्यांनी ओगले ग्लास फॅक्टरी आणि किर्लोस्कर कारखान्यात काही काळ नोकरी केली; परंतु नोकरीत त्यांचे मन रमले नाही. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला. त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ते फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सक्रिय सदस्य होते. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली.
काले या सातारा जिल्ह्यातील कराड या गावी 1919 मध्ये सत्यशोधक परिषदेचे अधिवेशन भरले होते. ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापन करावी अशी विनंती भाऊरावांनी केली आणि ती मान्यही झाली. दीन-दलित, बहुजन मुलांना शिक्षण दिले पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. सातारा जिल्ह्यातील काले या गावी विजयादशमीच्या मुहुर्तावर 4 ऑक्टोबर 1919 रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शेतकरी म्हणजेच रयत. रयतेला शिक्षण देणारी संस्था म्हणूनच या संस्थेला “रयत शिक्षण संस्था’ असे नाव देण्यात आले. पुढे 1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथे स्थलांतर झाले व सर्व जातिधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे एक मिश्र वसतिगृहाची स्थापना केली.
ग्रामीण जनता अडाणी असल्यामुळे कर्जबाजारीपणा, अंधश्रद्धा, जुन्या चालीरिती यात अडकली होती. शिक्षणाबद्दल उदासीन होती. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक होते. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न होता. शिक्षणासाठी परगावी ठेवणे व त्यासाठी खर्च करणे अशक्य होते. ग्रामीण जनतेच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर अगोदर त्यांच्या राहण्या-जेवणाची सोय केली पाहिजे, हे लक्षात घेऊन कर्मवीरांनी वसतिगृह सुरू केले.
25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे “श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामकरण केले गेले. सर्व जातिधर्मातील विद्यार्थी येथे वसतिगृहात एकत्र राहतात हे पाहून गांधीजींना खूप आनंद झाला होता. 4 एप्रिल 1933 रोजी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड हे सातारा येथे आले तेव्हा त्यांनी शाहू बोर्डिंगला भेट दिली. 1932 मध्ये कर्मवीरांनी युनियन बोर्डिंग हाउस या नावाने वसतिगृह पुणे येथे फर्गसन टेकडीच्या मागे असलेल्या वडार वस्तीजवळ झोपड्या बांधून सुरू केलं.
16 जून 1935 रोजी रयत शिक्षणसंस्था नोंदणीकृत झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. शिक्षण हे केवळ समाजातील मूठभर लोकांसाठी नसून ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तसेच यासाठी शिक्षक बहुजन समाजातूनच निर्माण झाले पाहिजेत म्हणून प्राथमिक शिक्षकांसाठी हे अध्यापक विद्यालय काढले. 1940 मध्ये “महाराजा सयाजीराव हायस्कूल’ या नावाने देशातले “कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ऍन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले. “कमवा आणि शिका’ योजना आज भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये अंमलात आणली गेली आहे. 1947 मध्ये भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची, तर 1954 मध्ये कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली. 1955 मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले.
कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान
अण्णांचे विद्यार्थी, शिक्षण, समाज यावर देखील अतिशय स्पष्ट व आजही मार्गदर्शक ठरतील, असे मौलिक विचार आहेत. कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान मानवतावादावर आधारलेले आहे. शिक्षण हे साध्य नसून साधन आहे. शिक्षण हा माणसाच्या जीवनाचा पाया आहे. मानवजातीच्या उत्कर्षाचे शिक्षण हे एक साधन आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण झाला पाहिजे. कर्मवीर विद्यार्थ्यांना सांगत की, शिक्षण घ्या, शहाणे व्हा, पालकांचे दारिद्य्र आपल्या शिक्षणाच्या आड येऊ देऊ नका, घाम गाळून शिका, समाजाच्या उपयोगासाठी शिका. शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न व जबाबदार नागरिक बनले पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता.
प्रभावी शिक्षण हे बलशाली राष्ट्र निर्माण करू शकते म्हणून शिक्षण हे सुलभतेने गरीब विद्यार्थ्यांना देणे ही फार मोठी राष्ट्रीय गरज आहे. शिक्षक हा खेड्यांचा आदर्श ग्रामसेवक आणि प्रभावी ग्रामनायक असला पाहिजे. विद्यामंदिरे व शिक्षणसंस्था ही पोट भरण्याची साधने न होता ती विचारांची व विकासाची उगमस्थाने झाली पाहिजेत. शाळेविना एकही खेडं असू नये, प्रशिक्षित शिक्षकाविना एकही शाळा असू नये, असा विचार ते करत.