गोंदवले – माण तालुक्यामध्ये चक्क वीजेच्या लहरीवर मोबाइल यंत्रणा सुरू असल्याचा अनुभव “बीएसएनएल’च्या माध्यमातून मिळत आहे. “डीजिटल इंडिया’ला यामुळे खो बसत असल्याने ग्राहक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. “अहो सर.. विजेबरोबर नेटवर्क गायब होत असल्याने माझा अभ्यास होणार तरी कसा, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
भारत संचार निगमच्या माध्यमातून मोबाइल नेटवर्कचे जाळे सुरवातीला सर्वत्र विखुरले. परंतु, अल्पावधीतच विविध खासगी कंपन्या उतरल्या अन् ग्राहक वाढीसाठी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेतही “बीएसएनएल’ने तग धरून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. माण तालुक्यात “बीएसएनएल’ ग्राहक संख्या मोठी आहे. सध्याच्या युगात “स्क्रीन टच अँड्रॉइड’ मोबाईलची मूलभूत गरज निर्माण झाली असतानाच दहिवडी व गोंदवलेमध्ये मात्र “बीएसएनएल’च्या तांत्रिक अडचणीने ग्राहक वारंवार “आऊट ऑफ रेंज’ राहत आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांच्यासह सर्वांनाच इंटरनेटची वारंवार गरज भासत आहे. मात्र, नेमक्या याच काळात नेटवर्क वारंवार गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः वीज गेल्यानंतर काही वेळातच संपूर्ण नेटवर्क ठप्प होत आहे. शिवाय वीज आल्यानंतरही बऱ्याच वेळानंतर नेटवर्क सुरळीत होत आहे. परिणामी डिजिटल व्यवहार करताना वारंवार अडचणी निर्माण होत आहेत.शिवाय विद्यार्थ्यांच्या अभ्यासालादेखील दांड्या पडत आहेत.
शेतकऱ्यांसाठी तर मोबाइल हा “शो पीस’ ठरत आहे. नेटवर्कअभावी महत्वाची अनेक कामे खोळंबली जात असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. याबाबत संबंधितांकडून माहिती घेतली असता, या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे सांगण्यात आले. ही अडचण लवकरात लवकर दूर करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.