– माधव विद्वांस
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ भारतीय चित्रपट-दिग्दर्शक आणि भारतरत्न सत्यजित रे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म कोलकाता येथे एका कलावंत बंगाली कुटुंबात 2 मे 1921 रोजी झाला. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, वर्ष 1940 मध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये दाखल झाले. चित्रकार नंदलाल बोस यांच्यासारख्या कलातज्ज्ञाचे त्यांना तेथे मार्गदर्शन मिळाल्याने सत्यजित यांची अंगभूत कला आणि सौंदर्यदृष्टी अधिकच विकसित झाली. त्यांना चित्रपटांचीही आवड होती.
ते अनेक नियतकालिकांतून चित्रपटविषयक लेखन करू लागले. वर्ष 1947 मध्ये त्यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने ‘कोलकाता फिल्म सोसायटी’ ही संस्था सुरू केली.वर्ष 1950 मध्ये त्यांना कंपनीतर्फे उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला पाठविण्यात आले. तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी अनेक उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट पाहिले. त्यातूनच ‘द बायसिकल थिव्ह्ज’ या चित्रपटामुळे त्यांना स्वतःचा चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली. बिभूतिभूषण बंदोपाध्याय या लेखकाच्या ‘पथेर पांचाली’ या कथेने भारावले होते.
याच कथेवर आपणही चित्रपट काढावा असा विचार करीत बोटीतून हिंदुस्थानात परत येत असतानाच त्यांनी त्यावर चित्रपटकथा लिहायला सुरुवात केली. भारतात परतल्यावर त्यावेळी कोलकाता येथे वास्तव्य असलेल्या फ्रेंच दिग्दर्शक जीन रेनॉयर यांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले व राय यांनी ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले. नोकरी सांभाळून फावल्या वेळात चित्रपट तयार करायचा असल्याने चित्रीकरणाचा कालावधी वाढत गेला. तसेच आर्थिक कमतरताही भासू लागली.
मात्र योगायोगाने पश्चिम बंगालचे तत्कालिन मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांनी चित्रपटाची कलात्मक मांडणी पाहून त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी बंगाल सरकारतर्फे स्वीकारली. त्यामुळेच रखडलेला चित्रपट वर्ष 1955 मधे पूर्ण झाला. त्याच वर्षी न्यूयॉर्कची ‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट’ ही संस्था भारतीय कलेचे प्रदर्शन भरविणार होती. संस्थेच्या रे यांना परिचित असलेल्या एका प्रतिनिधीने चित्रपटाचा काही भाग तत्पूर्वी पहिलाही होता. अचानक न्यूयॉर्कहून चित्रपट दाखविण्याबद्दल मागणी आली. म्हणून रात्रंदिवस मेहनत करून चित्रपट पूर्ण करण्यात आला. ‘पथेर पांचाली’चे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्कमध्ये झाले.
‘पथेर पांचाली’च्या न्यूयॉर्कच्या प्रदर्शनामुळे हा चित्रपट व सत्यजित रे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर वितरक एडवर्ड हॅरिसन यांनी 1956च्या कान येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्याची व्यवस्था केली. सर्व परीक्षकांनी ‘मानवतेचा अत्युत्कृष्ट आलेख’ अशी एकमुखी शिफारस केली. त्यानंतर 1955 ते 1985 या तीन दशकांत रे यांनी 25 चित्रपट व काही अनुबोधपट निर्माण केले.
त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्यूरी म्हणून अनेक देशांत काम केले. दादासाहेब फाळके पुरस्कार, ऑक्सफर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी, ब्रिटिश फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीजतर्फे सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून सन्मान असे अनेक सन्मान त्यांनी प्राप्त केले. 23 एप्रिल 1992 रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.