गीतकार, नाटककार आणि महाराष्ट्रातील लोककलांचे अभ्यासक व संशोधक अशोक परांजपे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे 30 मार्च 1941 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण हरिपूर व सांगली येथे झाले. त्यांना लहानपणापासूनच नाटक, लोकनाट्य, गीत, संगीत, चित्रकला यांची आवड होती. मुंबईत काही काळ जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यांनी चित्रकलेचे धडे घेतले.
सांगली परिसर हा पूर्वीपासून सर्व प्रकारच्या कवी, कलाकार, लेखक यांचा जिल्हा मानला जातो. अशोक हे शाहीर आनंदराव सूर्यवंशी, शाहीर बापूराव विभुते, तमाशा कलावंत शंकरतात्या सावजळकर, काळू-बाळू अशा लोककलावंतांच्या संपर्कात असायचे. त्यामुळे ग्रामीण, शहरी भागातील चालणाऱ्या शाहिरी, सोंगी भारुड, दत्तपंथी भजन, तमाशा, करपल्लवी या लोककला त्यांना आवडू लागल्या.
मराठी रंगभूमीला त्यांनी संत कान्होपात्रा, संत गोरा कुंभार, अबक दुबक, आतून कीर्तन वरून तमाशा, दार उघड बया सारखी अनेक नाटके दिली.
गीतकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गण-गवळण आणि नाट्यगीत या सर्व प्रकारची गीते लिहिली. त्यांनी कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, अवघे गरजे पंढरपूर, दीनांचा कैवारी दु:खितांचा सोयरा, समाधी घेऊन जाई ज्ञानदेव या सारखी हृदयाला भिडणारी भक्तिगीते लिहिली. या गीतांमधून रसिकांना भक्तिरसात चिंब भिजवणारे तसेच रसिकांच्या ओठावर कायम असणारी नाविका रे वारा वाहे रे, केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, दारी पाऊस पडतो रानी पारवा भिजतो, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, पाखरा जा दूर देशी अशी सुंदर भावगीते रचली.
हरिपूरच्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये केलेल्या नौकाविहाराच्या आठवणीतून त्यांनी नाविका रे वारा वाहे रे, डौलानं हाक जरा आज नाव रे! हे त्यांनी रचलेले, सुमन कल्याणपूर यांनी गायलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले गीत खूपच लोकप्रिय आहे. इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्राचे संचालक म्हणून अशोक परांजपे यांनी जबाबदारी स्वीकारली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती.
या केंद्राची स्थापना वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या हस्ते झाली. वर्ष 1986 साली याच संशोधन केंद्रातर्फे आनंदवन वरोरा येथे आदिवासी महोत्सवाच्या आयोजनाची कल्पनाही अशोक यांचीच होती. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी महोत्सवाला मार्गदर्शन केले होते व दामू झवेरी, कपिला वात्सायन, दुर्गा भागवत आदी मान्यवर या महोत्सवाला उपस्थित होते. वर्ष 1992 मध्ये पंढरपूर येथे भक्तिसंगीत महोत्सवाचे आयोजन त्यांनीच केले होते.
महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाच्या संचालकपदावर काम करीत असताना त्यांनी आपला लोककलेचा अभ्यास व
स्वतःचे साहित्य कौशल्य पणाला लावून काम केले. तसेच आयएनटी रिसर्च सेंटरचं त्यांचं काम सुरू असताना संपूर्ण महाराष्ट्रातल्या खेडोपाडी जाऊन त्यांनी लोककलावंतांची झाकली माणके हेरून त्यांच्याशी संपर्क साधला व अशा माहीत नसलेल्या कलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या. त्यांच्या कार्याची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली तसेच ऑस्ट्रियातल्या आयओव्ही या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेनं अशोक यांना सभासदत्व दिलं. 9 एप्रिल 2009 रोजी औरंगाबादेतील निवासस्थानी त्यांनी स्वदेहत्याग केला.
माधव विद्वांस