पंतप्रधानांच्या नवीन पंधरा कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
पुणे – राज्यातील अल्पसंख्याकांच्या कल्याणाकरिता पंतप्रधानांच्या नवीन पंधरा कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समितीतील नामांकित संस्थांतील प्रतिनिधींच्या नियुक्त्या रद्द केल्या. आता या समितीत नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी व स्थानिक अल्पसंख्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्या स्थापन केल्या होत्या. अल्पसंख्यांच्या कल्याणाशी संबंधित इतर अधिकारी, जिल्ह्यातील सर्व लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, ग्रामीण व नागरी क्षेत्रातील अल्पसंख्याक कल्याणाशी संबंधित स्थानिक पंचायत राज संस्थांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या तीन नामवंत अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश केला होता.
यातील अशासकीय प्रतिनिधींच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. आता या समितीत ग्रामीण तसेच नागरी क्षेत्रातील अल्पसंख्याक कल्याणाशी संबंधित स्थानिक पंचायत राज संस्थांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या तीन नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची नामनिर्देशने शासन निर्णयानुसार नमूद केलेल्या पद्धतीनुसार तपासून आपल्या शिफारशीसह शासनास सादर करावी लागणार आहेत. याबाबतचे आदेश अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव वि. मा. सोनवणे यांनी जारी केले आहेत.