कोयनानगर – ”तुम्ही डॅमेज कंट्रोल करा, मी विकासकाम करणारच”, असे प्रत्युत्तर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना दिले.
पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या ३० ग्रामपंचायती, ४५ वर्षांची एकहाती सत्ता असणारी कृषी उत्त्पन्न बाजार समिती लोकशाहीच्या मार्गाने १५ विरूध्द ३ चे बलाबल घेऊन शिवसेनेने ताब्यात घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसची पाटण तालुक्यात झालेली पडझड रोखण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा दौरा राष्ट्रवादीचे नेते सत्यजीत पाटणकर यांनी तालुक्यात आयोजित केला. त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न होता, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शंभूराज देसाई म्हणाले, ”पाटण तालुक्यात असे किती मेळावे, किती सभा झाल्या तरी या पाटण तालुक्यात जो नेता विकासाची कामे करतो, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवत असतो, लोकांसाठी उपलब्ध असतो अशाच नेतृत्वाच्या मागे जनता राहील याच्यावर माझा विश्वास आहे. कोयना विभागातील हेळवाक येथे रानगव्याने शेतीचे केलेल्या नुकसान केलेल्या प्रश्नांवर आपण यापूर्वीच प्रशासनाला पंचनामा करून बाधिताला तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत संवेदनाशील असणारे सरकार असून हा प्रश्न सोडविण्यासाठी मी सक्षम व डोळस पालकमंत्री आहे. ज्यांनी तुम्हांला हे दाखवायला नेले त्यांनाच याची कल्पना नसेल, असा खोचक टोला त्यांनी यावेळी पाटणकर पिता पुत्रांना लगावला.
महाविकास आघाडीमधील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, हा दावा आम्ही करत नाही तर ही वस्तुस्थिती आहे. विरोधी पक्ष नेत्यांना सुध्दा हे मान्य आहे. त्यांना खासगीत विचारा. योग्य वेळी ते समोर येईलच. १० महिन्यांत राज्यातील विकासाचा दर वाढला आहे. अडीच वर्षात तो दिसत नव्हता. अडीच वर्षात त्यांनीच नोकरभरतीला परवानगी दिली नाही. राज्यातील ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सत्यात आला आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले. भूकंपग्रस्त दाखल्यामुळे भूकंपग्रस्तांना नोकऱ्या मिळत आहेत. विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीत बसल्यामुळे अजित पवार असे बोलत आहेत. त्यांना सर्व वस्तुस्थिती माहीत व मान्य आहेत, असे त्यांनी सांगितले.
सरकार काम करतंय हे लोकांना माहीत आहे. लोकांना पटतंय पण विरोधीपक्ष ‘कळतंय पण वळत नाही’ या भूमिकेतून सरकारवर टीका करत आहे. त्यांनी टीका करण्याचे काम करावे, आम्ही राज्याच्या हित जोपासण्याचे विकासकाम करण्याचे काम करणारच असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.