वॉशिंग्टन : साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर खाणींमधून उत्खनन करून विविध प्रकारचे खनिज पदार्थ बाहेर काढले जातात आणि त्यांचा वापर केला जातो पण आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर मिळणाऱ्या खनिजांची टंचाई वाढत चालली असल्याने समुद्राच्या तळाशी जाऊन खाणींमधून काही महत्त्वाचे पदार्थ बाहेर काढण्याचा उद्योग सुरू होणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जगाचा पाठीवर सर्वत्रच मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर महाग धातूंची गरज असते. या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निकेल कोबाल्ट सल्फाईड यासारख्या खनिज धातूंची गरज असते, पण पृथ्वीच्या पृष्ठभागावर मिळणाऱ्या या धातूंची टंचाई वाढत चालली असल्याने आता समुद्राच्या तळाशी शोध घेऊन खाणकाम करून हे धातू बाहेर काढले जाणार आहेत.
जगातील सर्वच पर्यावरण तज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होईल असेही म्हटले आहे. समुद्राच्या तळाशी जाऊन अशा प्रकारे मोठया प्रमाणावर खाणकाम केले तर पर्यावरणाला मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो आणि पर्यावरणाचे संतुलनही बिघडू शकते असा धोक्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. समुद्राच्या तळाशी हे सर्व धातू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असले तरी खाणकाम करून ते बाहेर काढले तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
पर्यावरण संतुलनमध्ये समुद्राची भूमिका खूप मोठी आहे 50% ऑक्सिजन समुद्रामुळे निर्माण होऊ शकतो, तर वातावरणात तयार होणाऱ्या एकूण कार्बन डाय-ऑक्साइड पैकी 25% कार्बन-डाय-ऑक्साइडचे शोषण समुद्र करू शकतो पण समुद्राच्या तळाशी खाणकाम करून जर पर्यावरणाचे संतुलन बिघडवले तर पृथ्वीलाही त्याचे परिणाम भोगावे लागतील असे तज्ञांनी म्हटले आहे.
नॅशनल युनियन फॉर कन्सर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, अशा प्रकारे जर डीप सी मायनिंग म्हणजे समुद्राच्या तळाशी जाऊन खाणकाम केले तर जैवविविधताही धोक्यात येऊ शकते. समुद्रातील अनेक जीवांना त्रास होऊ शकतो. खोल समुद्रात विविध प्रकारची जीवसृष्टी कार्यरत आहे. समुद्राच्या तळाशी जाऊन जर माणसाने हस्तक्षेप केला तर ही जीवसृष्टी संकटात येऊ शकते.