राजगुरूनगर -राजगुरूनगर येथे बुधवारी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला जवळपास अर्धातास झालेल्या या पावसात शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर वाडा रस्त्यावर वाहनचालकांमुळे नागरिकांच्या अंगावर पावसासोबतच गटारीचे घाण पाणी उडत असल्याने चालकाला नागरिकांकडून शिव्यांचा भडिमार सहन करावा लागला.
राजगुरूनगर शहरात वाडा रस्त्यावरील मोठी गटारे काही बांधकाम व्यवसायिकांनी बुजवली आहेत. जी आहेत त्यात गाळ, वस्तू अडकल्याने तुंबलेली आहेत. मोठा पाऊस झाला की पावसाचे पाणी शहरातून छोट्या मोठ्या रस्त्यावरून गल्लीतून मोठ्या प्रमाणात वाहत असते. गेली अनेक वर्षे अशी परिस्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाडा रस्त्याकडे दुर्लक्ष आहे तर नगरपरिषद शहरातील गटारांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे यावरून जा – ये करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत तर पाणी जाणाऱ्या रस्त्याजवळील घरासमोर घाण साचत आहे.
गेली अनेक वर्षे हे सुरू असून याकडे दुर्लक्ष होत आहे वाडा रस्त्यावर संगम क्लासिक जवळ मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येते येथे मोरी टाकण्याची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे शिवाय गटारे बुजवल्याने ती पूर्ववत करीत नाहीत शहरात रस्त्यावर पाणी येण्याला बांधकाम विभागच कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, बुधवारी अर्ध्या तासाच्या जोरदार पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले जर दोन-तीन तास अतिवृष्टी झाली तर शहरातील परिस्थिती गंभीर होणार आहे. आजच्या पावसामुळे अनेक सहकारी सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी घुसले. राजगुरूनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील नादुरुस्त गटारे दुरुस्त करावीत पाणी योजनेची पाइपलाइन टाकण्याची अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.