नगर – परतीच्या मान्सूनची नगर जिल्ह्यावर मेहरनजर अजूनही कायम आहे. शनिवार व रविवारच्या पावसानंतर जिल्ह्याची पावसाचेया आकडेवारीत बरीच सुधारणा झाली असून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत पावसाच्या आकडेवारीने सरासरीची 100 गाठली आहे.यापावसानंतर जिल्ह्यात साधारणतः133 टक्क्यांइतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
तर शहरात मंगळवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या दरम्यान शहरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सीना नदी वाहती झाली, पुराचे पाणी कल्याणरोडवरील पुलाला टेकले होते. मात्र पुलावर पाणी न आल्याने वाहतूक सुरळीत होती. सोमवारी सकाळी 8 ते मंगळवारी सकाळी 8 या कालावधीत झालेल्या पावसाची दोन इंच नोंद इतकी झाली. शहरातील वाडीयापार्क क्रीडा संकुलाबाहेरील गाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने विक्रेत्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले.
शनिवार व रविवारी सलग दोन दिवस नगर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली, सोमवारी पहाटेही पावसाची रिमझिम सुरु होती, मात्र शनिवार व रविवारच्या पावसामुळे शहरातील बहुतेक रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होते. परंतु पावसाच्या उघडपीमुळे मतदारांना पावसाचा व्यत्यय आला नाही. दरम्यान, सोमवारी पावसाने दिवसभर विश्रांती घेतली मात्र मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास जोरदार पावसास प्रारंभ झाला.हा पाऊस साधारण तासभर सुरू होता.
त्यानंतर सकाळी आठपर्यंत किरकोळ स्वरुपाची रिमझिम सुरु होती. परंतु पहाटेच्या पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक मंद गतीने सुरू होती, हॉटेल संकेत, सिध्दीबाग समोरील निलक्रांती चौक तसेच शहराच्या इतर सखल भागानध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकाना मोठी कसरत करावी लागली. वाडीया पार्क क्रीडा संकुलाच्या गळ्यामध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक विक्रेत्यांनी दिवाळीसाठी नवीन माल विक्रीसाठी आणला होता. गाळ्यामधील पाणी काढून विक्रेत्यांना माल सुरक्षित ठिकाणी हलवावा लागला.
जिल्ह्यातील चौदा तालुक्यांपैकी बारा तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. धरणांमधून पाणी सोडल्याने मुळा, गोदावरी, प्रवरा, भीमा नद्या वाहत्या झाल्या आहेत. परतीच्या मान्सूनमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या जोर धरतील मात्र ऐन काढणीच्या आणि मळणीच्या वेळी पावसाचा जोर असल्याने पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील द्राक्ष पिकावर बुरशीजन्य रोगाचे आक्रमण होण्याचा धोका आहे.