पणजी -संसदेने मंजूर केलेली कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका विरोधकांनी घेतला आहे. त्यातून ते विधेयकांना विरोध करत आहेत, असा निष्कर्ष केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी काढला आहे.
कृषी विधेयकांवरून देशभरात वातावरण तापले आहे. विधेयकांना विरोध दर्शवण्यासाठी काही राज्यांत शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आहे. त्याचा आधार घेऊन विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यापार्श्वभूमीवर, गोवा भाजपच्या बैठकीला उद्देशून मेघवाल यांनी व्हर्च्युअल भाषण केले. त्यावेळी त्यांनी कृषी विधेयकांचे जोरदार समर्थन करताना विरोधकांवर पलटवार केला. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस विधेयकांमुळे हातभार लागेल. देशाच्या विकासाचे इंजिन असे स्वरूप कृषी आणि कामगार सुधारणांना प्राप्त होईल.
अल्पकाळ चाललेल्या संसद अधिवेशनात घाईघाईने कृषी विधेयके मंजूर करण्यात आल्याची टीका विरोधक करत आहेत. ते खोटा प्रचार करत आहेत. संसदेचे अधिवेशन सलग 18 दिवस चालवण्याची सरकारची इच्छा होती. मात्र, करोना संकटामुळे अधिवेशन लवकर आटोपते घेण्याची मागणी विरोधकांकडूनच करण्यात आली, असे ते म्हणाले. मोदी सरकारने आणलेली विधेयके अनेक दशकांपासून प्रलंबित होती. त्यामुळे ती घाईने मंजूर करण्यात आल्याचे म्हणता येऊ शकणार नाही, अशी पुस्तीही मेघवाल यांनी जोडली.