नवी दिल्ली – पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांसाठी जाहीर सभा आणि रोड शोवर असणाऱ्या बंदीची मुदत निवडणूक आयोगाने 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवली. मात्र, बैठक आणि प्रचारासाठी असणाऱ्या उपस्थितीवरील निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता दिली.
निवडणूक आयोगाने पक्षांना काही निर्बंधातून सवलत दिली आहे. खुल्या जागेतील बैठकीस एक हजार जणांची उपस्थिती किंवा जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के अथवा राज्य आपत्कालीन विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जी किमान उपस्थिती असेल तेवढी मान्य करण्यात येईल.
ही सवलत मंगळवारपासून (दि. 1) लागू करण्यात येईल. दारोदार होणाऱ्या प्रचारात 10 ऐवजी 20 व्यक्तींच्या सहभागाला परवानगी असेल. त्यातून सुरक्षा रक्षकांना वगळण्यात येण्याचे आदेश दिले आहेत.
बंदिस्त सभागृहात होणाऱ्या बैठकीस 300 ऐवजी 500 जण किंवा आपत्कालीन विभागाने दिलेली मंजुरी यापैकी जी संख्या कमी असेल तेवढ्या जणांच्या उपस्थितीस मान्यता देण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने निवेदनात म्हटले आहे.