नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी राज्य मुख्यालयात पक्ष संघटनेची बैठक घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पक्ष संघटनेत राज्य पातळीवर तीन प्रभारी करण्याची घोषणा त्यांनी केली. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर हे बदल करण्यात आले आहेत.
बाबू मुनकाद अली, राजकुमार गौतम आणि विजय प्रताप यांना राज्याचे प्रभारी बनवण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षपदी भीम राजभर यांना कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय समन्वयक म्हणून आकाश आनंद कायम राहणार असून, त्यांच्यासोबत रामजी गौतम यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
या बैठकीत मायावती यांनी निवडणुकीचा आढावा घेतला आणि पुढील तयारीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे सांगितले. तसेच संघटनेत काम करणाऱ्यांना पदोन्नती देऊन निष्क्रिय कार्यकर्त्यांना सतर्क केले जाईल, असेही मायावती यांनी म्हटलं.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, बसपाला राज्यातील 403 विधानसभा जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आली. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर बसपा जवळपास संपल्याचे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे. त्यांच्या व्होटबँकेचा मोठा भाग भाजप आणि इतर पक्षांकडेही गेला आहे.
2007 मध्ये राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केल्यानंतर, 2022 मध्ये पक्षाला केवळ एक जागा मिळाल्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.