देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. ढगे पाटील यांची माहिती
आळंदी (वार्ताहर) – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजन बुधवारी (दि. 20), मुख्य कार्तिकी एकादशी शनिवारी (दि. 23) आणि माउलींचा संजीवन समाधीदिन सोहळा सोमवारी (दि. 25) परंपरेने साजरा केला जाणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांनी दिली.
आळंदीत दरवर्षी कार्तिकी वारी सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. सोमवारी (दि. 18) व मंगळवारी (दि. 19) किर्तन, प्रवचन असा नैमित्तिक कार्यक्रम मंदिरात आहे. बुधवारी (दि. 20) कार्तिक वद्य अष्टमीला सकाळी गुरू हैबतबाबांचे पायरी पूजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर योगिराज ठाकूर, बाबासाहेब आजरेकर यांच्यावतीने किर्तनसेवा आणि रात्री वासकर महाराज, मारूतीबुवा कराडकर, आरफळकर यांच्यावतीने जागरचा कार्यक्रम होईल. कार्तिक वद्य नवमीला गुरूवारी (दि. 21) बाबासाहेब देहूकर आणि वासकर महाराज यांचे विणा मंडपात किर्तन तर कार्तिक वद्य दशमीला शुक्रवारी (दि. 22) गंगूकाका शिरवळकर, धोंडोपंतदादा शिरवळकर, वासकर महाराज यांचे किर्तन आणि रात्री वाल्हेकर महाराज यांच्यावतीने जागरचा कार्यक्रम होईल.
शनिवारी (दि. 23)कार्तिकी वद्य एकादशी असल्याने मध्यरात्रीपासून माउलींच्या संजीवन समाधीवर पवमानपूजा, दुग्धाअभिषेक अकरा ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देवूळवाड्याच्या बाहेर पडेल. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी सायंकाळी मंदिरात पुन्हा प्रवेश करेल. दरम्यान, भाविकांचे दर्शन दिवसभर सुरू राहणार आहे. रविवारी (दि. 24) मध्यरात्री प्रांताधिकारी यांच्या हस्ते पहाटपूजा माऊलींच्या समाधीवर होईल. त्यानंतर दुपारी रथोत्सवासाठी माऊलींची पालखी मंदिरातून बाहेर पडेल. गोपाळपूरा येथे माउलींची पालखी रथात ठेवून नगरप्रदक्षिणा केली जाणार आहे. यावेळी हरिभाऊ बडवे आणि केंदूरकरांच्यावतीने किर्तन होईल. त्यानंतर मानकरी, दिंडीकरी सेवेकरी यांना नारळप्रसाद वाटप केले जाणार आहे.
26 नोव्हेंबरला सोहळ्याची सांगता
माउलींचा मुख्य समाधीदिन सोहळा सोमवारी (दि. 25) असून रविवारी (दि. 24) मध्यरात्री प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते पवमान अभिषेक माऊलींच्या समाधीवर केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या कालावधीत विणामंडपात माउलींच्या समाधी सोहळ्याचे किर्तन पंढरपूरातील संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांचे होईल. दुपारी बारा वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर माउलींचा समाधीदिनाचा कार्यक्रम पूर्ण होईल. त्यानंतर आरफळकरांच्यावतीने जागरचा कार्यक्रम होईल. शेवटी अमावस्येला मंगळवारी (दि. 26) समाधीसोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता फटाक्यांची आतिषबाजी आणि पालखी छबिना मिरवणुकीने होईल.