सातारा -शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्याचा लढा आधुनिक पद्धतीने शालेय मुलामुलींपर्यंत पोहचवणारा अभिनव उपक्रम हाती घेतला असून हा मावळ्यांची शाळा उपक्रम लवकरच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल, अशी घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बुधवारी (ता. 23) जाहीर केल्यानुसार मोठ्या घोषणेतील एक घोषणा त्यांनी काही वेळापुर्वीच ट्विट केली आहे. उदयनराजे लिहितात ब्रिटीशांच्या गुलामीतून संघर्ष करून बाहेर आलेला आणि स्वातंत्र्य उपभोगत असलेला आपला भारत देश अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहे. शिक्षण क्षेत्रदेखील त्याला अपवाद नसून याही क्षेत्रात आमुलाग्र बदल आपण पाहिले आहेत.
मात्र, अजूनही शाळांमध्ये इतिहास हा केवळ एक विषयापुरता मर्यादित राहिला आहे. सनावळ, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती प्रेरणा मिळताना दिसत नाही. त्यामुळे शिवछत्रपतींचा खरा इतिहास आधुनिक तसेच रंजक पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून “मावळ्यांची शाळा’ उपक्रम राबविणार आहोत.
या उपक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन आधुनिक आणि रंजक पद्धतीने शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्य लढा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल. रटाळ सनावळ्या पाठ करून घेण्याच्या रुक्ष प्रथेला खंड देत प्रोजेक्टर्स आणि व्हिज्युअल ग्राफिक्सच्या सहाय्याने आपल्या मातीमध्ये घडलेल्या आणि आपल्या मातीसाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांच्या शौर्यगाथा शिकविल्या जातील.
शालेय अभ्यासक्रम ज्या वीरयोद्ध्यांना विद्यार्थ्यांपासून वंचित ठेवतो, त्या स्वराज्ययोद्ध्यांना त्यांच्यापर्यंत आधुनिक पद्धतीने पोहोचवताना त्यांच्या चारित्र्यातून काय शिकावे, एकूणच शिवचरित्रातून कोणते बोध घ्यावेत, याचा अभ्यासपूर्वक विचार करून या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.