पिंपरी – गेल्या विधानसभा निवडणुकीपासून मावळ तालुक्यात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी हा सामना रंगत आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात महाआघाडीचे सरकार होते. मावळमधील आमदारही याच पक्षाचा असल्याने भाजप बॅकफूटवर गेला होता. मात्र आता राज्यात भाजप सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाली आहे. एकीकडे आमदार सुनील शेळके यांनी मावळमध्ये विकासकामांचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बाळा भेगडे हे देखील तालुक्यासाठी भरघोस निधी आणत आहेत. राजकीय चढाओढीतून मावळचा विकास होत असल्याचे दिसून येत आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्यानंतर तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर देवस्थान आणि वडगाव मावळचे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदीर देवस्थान यांना तिर्थक्षेत्राचा क दर्जा देण्यात आला.
यामुळे या दोन्ही ठिकाणच्या विकासाकरिता शासनाकडून निधी मिळणार आहे. तसेच मावळ तालुक्यातील साकव कामासाठी नुकताच एक कोटी 20 लाख रुपये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर केल्याचेही भेगडे यांनी सांगितले. तसेच यापुढील काळातही आपण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी आणणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले. तसेच आपल्या आमदारकीच्या काळातील 100 कोटींची कामे आता सुरू केली असून त्याचा आढावाही माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे घेत आहेत.
तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदार सुनील शेळके यांनीही शासनाकडून मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी आणला. त्यामध्ये लोणावळा, कान्हे येथील दोन जिल्हा उपरुग्णालयासह वैद्यकीय उपचारांकरिता तब्बल 80 कोटींचा निधी आणला. तसेच पवना आणि इंद्रायणी नदीवरील बंधारे व पुलांसाठी 92 कोटींचा निधी आणला. तसेच शासकीय इमारतींसाठी 37 कोटींचा निधी आणला. याशिवाय डोणे-आढले, कार्ला, कुसगाव, डोंगरगाव, पाटण, खडकाळा येथील जलजीवन मिशन योजनेतून तब्बल 260 कोटींची कामे मंजूर केली आहेत.
शह-प्रतिशह मध्ये नागरिक सुखावले
राजकारणात शह-प्रतिशह देण्याचे काम नेहमीच सुरू असते. मात्र मावळ तालुक्यात विकासकामांसाठी शासनाकडून निधी आणण्याची चढाओढ राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर सुरू असलेल्या राजकीय द्वंद्वाची मजा मावळमधील नागरिक घेत आहे. ऐकमेकांची विकासकामे न अडविता शासनाकडून जास्तीत जास्त कसा निधी आणता येईल याकडे या दोन्ही पक्षांनी पाहणे गरजेचे आहे. मात्र या राजकीय चढाओढीतही मावळचा विकास होत असल्याचे पाहून येथील नागरिक सुखावले आहेत.