देहू – मराठा आरक्षणाची मुंबईत घोषणा झाल्यानंतर आंदोलकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. गावाला जाण्यापूर्वी हे आंदोलक धार्मिकस्थळांना भेट देत आहेत. परतीच्या प्रवासातील देहू-आळंदी या तिर्थक्षेत्राच्याठिकाणी भगवे ध्वज लावलेली आंदोलकांची वाहने दिसत आहेत. याशिवाय गळ्यात भगवे उपरणे घातलेले आंदोलक लक्ष वेधून घेत आहेत. या आंदोलकांचे परतीच्या प्रवासातही नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतत्वाखाली केलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आले आहे. त्यामुळे आंदोलकांचा मुंबईतील मुक्काम आता टळला आहे. या यशानंतर आंदोलकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. बहुतांशी आंदोलक हे मराठवाड्यातील असून, परतीच्या प्रवासात आपले श्रद्धास्थान असलेल्या स्थळांना ते भेट देत आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाला मानणारे हे आंदोलक देहूत तुकोबाराय व आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधीवर नतमस्तक होताना दिसत आहेत.
मराठा आरक्षणाचे आंदोलन मागे घेतल्यानंतर कालपासून आंदोलक आपल्या वाहनांमधून घरी परतू लागले आहेत. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलक परतीच्या प्रवासादरम्यान आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत. त्यामुळे या दोन्ही धार्मिकस्थळी मराठा आरक्षण आंदोलनाचा फिल दिसत होता.