आळंदी – करोनाच्या साथीमुळे तब्बल आठ महिने माउलींचे द्वार बंद होते. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर माउली मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडणार आहेत. मात्र, राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले. मंदिर खुले होत असल्याने आळंदीकरांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.
लक्ष्मीपूजनच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्व देव-देवतांची मंदिरे काही अटी शर्ती व नियमावली तयार करून ती मर्यादित वेळेतच खुली करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार माउली मंदिर सोमवारी (दि. 16) सकाळी सहा वाजता मंदिर काही अटी शर्तीवर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
मंदिर उघडल्यानंतर आज पहिल्या दिवशी ह भ प अशोक महाराज साखरे शास्त्री यांच्याकडून माऊली मंदिराची सजावट करण्यात आली.
दरम्यान, नियमित पहाटे चार ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत नित्याचे विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी देवस्थानकडून काही नियमावली तयार करण्यात आली असून त्याचा भाविकांनी आदर करून मंदिरात प्रवेश करावा, दर दोन-तीन तासांनी अर्धा तास मंदिर स्वच्छतेसाठी दर्शन बंद राहील.
मंदिरात येताना सॅनिटायझर, मास्क गरजेचे आहे. मंदिरात एकत्रित येणे टाळावे, “श्रीं’च्या दर्शनाची व्यवस्था दुरूनच करण्यात आली आहे. तसेच महाद्वारातून भाविकांना “श्रीं’च्या मुखदर्शनासाठीच सोडले जाईल. त्यानंतर लगेच पान दरवाजातून भाविकांना बाहेर यावे लागेल. दर्शन झाल्यानंतर मंदिरात कोठेही बसता येणार नाही.