मुंबई – आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद आशिया क्रिकेट परिषदेने श्रीलंकेकडे सोपवले असून वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे; परंतु श्रीलंकेमध्ये प्रचंड हिंसाचारामुळे आशिया चषक स्पर्धा संकटात सापडली आहे.
महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही नागरिकांचा रोष कमी झालेला नाही. देशभरात प्रचंड हिंसाचार सुरू असताना राजपक्षे यांच्या घराला निदर्शकांनी आग लावली आहे. त्यामुळे या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडून हिसकावले जाऊ शकते. ही स्पर्धा टी-20 प्रकारामध्ये खेळवली जाणार आहे. कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी तयारी करण्याची संधी मिळणार आहे.
श्रीलंकेतील अशी परिस्थिती पाहता आशिया स्पर्धा पार पडणे अशक्य आहे. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलिया जून-जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या मालिकेवरही धोक्याची घंटा वाजत आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत आयोजित न झाल्यास यजमानपद दुबईकडे सोपवण्याबाबत चर्चा होऊ शकते.