नवी दिल्ली – गेले महिने नकार दिल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी भारतात सामुहिक संसर्गाची स्थिती असल्याचे कबूल केले. मात्र ही स्थिती काही भागातच मर्यादितच असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. “संडे संवाद’ या वेबिनारमध्ये ते बोलत होते. त्यात त्यांना ममता बॅनर्जी यांनी सामुहिक संसर्ग असल्याचे म्हटले आहे त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नला उत्तर देतान मंत्री म्हणाले, “पश्चिम बंगालसह अनेक राज्यातील काही भागात विशेषत: घनदाट वस्ती असणाऱ्या क्षेत्रात सामुहिक संसर्गाची स्थिती आढळली आहे. मात्र ही स्थिती संपूर्ण देशभर नाही. मर्यादित राज्यातील मर्यादित जिल्ह्यांमध्ये ही स्थिती आहे.’ अशी कबुली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या आठवड्यात या आधी दुर्गापुजेवेळी नागरिकांनी सावधानता बाळगावी करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, कारण सामुहिक संसर्गाची स्थिती आहे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले होते.
भारतात करोनामध्ये अधिक हानीकारक बनल्याचे कोणतेही महत्वाचे परिवर्तन दिसून आलेले नाही. तसेच वर्तमानपत्र ही पूर्णत: सुरक्षित असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, एवढ्या बाधितांमध्ये वर्तमानपत्रामुळे बाधा झाल्याचे एकही उदाहरण भारतात सापडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत बायोटेक सार्स-कोव्ह -2 म्हणजेच करोनावर नाकावटे देण्यात येणारी लस बनवत असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली. वॉशिंग्टन विद्यापीठाशी त्यांनी त्याबाबतचा करार केला आहे. त्यांच्या मार्फतच याच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.