नाशिक – कोरोनाचा नवा प्रकार समोर आला असून विदेशात या प्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात आता कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजनांची तयारी सुरु आहे. गेले अनेक दिवस मासमुक्त फिरणारे आता मास्क लावून फिरताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
करोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता आता राज्यातील महत्वाची मंदिरे प्रशासनाकडून मास्क सक्ती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरासह वणीचे सप्तशृंगी गडावर भाविकांना मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वच राज्यांना सतर्क राहण्याच्या आदेश दिलेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी याबाबत आढावा घेत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. सध्या तरी मास्क घालणे बंधनकारक नसले तरीही भारतात करोना प्रकरणे वाढल्यास सक्ती केली जावू शकते. परंतु आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीकोनातून शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. अनके मंदिर व पर्यटनस्थळी ठिकाणी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर दुसरीकडे वणीच्या सप्तशृंगी गडावरही मास्कचा वापर बंधनकारक केला असून गर्दी टाळण्याबाबत भाविकांना आवाहन करण्यात आले आहे. आजपासून भाविकांनी केंद्र व राज्य शासनाचा प्राप्त सूचनेनुसार विश्वस्त संस्थेच्या नियमावलीनुसार मास्कचा वापर करूनच भगवती दर्शनासाठी मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर गर्दी टाळण्याच्या हेतूने सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच बूस्टर डोस प्रकारातील लसीकरणाची पूर्तता करावी, असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील मंदिरात मास्क बंधनकारक –
सध्या वर्षसमाप्तीनिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनाही सुट्टी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने मास्क संदर्भामध्ये निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थान सतर्क झाला आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्ससह सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतलेला आहे. पण भाविकांना मात्र अद्याप मास्क सक्ती केलेली नाही. दुसरीकडे पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा मास्क संदर्भामध्ये निर्णय आज होणार आहे. आज मुंबईमधील मुंबादेवी मंदिरांमधील कर्मचाऱ्यांना मास घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय भाविकांनी देखील मास्कचा वापर करावा असा आवाहन करण्यात आला आहे.
दरम्यान, करोनाची प्रकरणे वाढण्याचा धोका लक्षात घेऊन तसेच पुर्वी झालेल्या चुका टाळून प्रशासन सतर्क झाले आहे. सर्वांनी कोविड नियमावलींचे पालन करावे, त्रिसुत्रीचे पालन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.