शहीद झालेल्या वडिलांसाठी मुलगा लेफ्टनंट होऊन त्यांच्या बटालियनमध्ये सामील झाला यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते. आपण ज्या मुलाबद्दल बोलत आहोत त्यांचे नाव लेफ्टनंट नवतेश्वर सिंह आहे. जेव्हा ते तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे होते तेव्हा त्यांचे वडील मेजर हरमिंदर पाल सिंग एप्रिल 1999 मध्ये जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. आता चोवीस वर्षांनंतर, नवतेश्वर सिंग यांची ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) चेन्नई येथून त्यांच्या वडिलांच्या बटालियन 18 ग्रेनेडियर्समध्ये नियुक्ती झाली आहे.
वडिलांप्रमाणेच नवतेश्वरलाही सैन्यात भरती व्हायचे होते –
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मेजर हरमिंदर पाल सिंग हे मोहालीजवळील मुंडी खरारचे रहिवासी होते. ते स्वतः कॅप्टन हरपाल सिंग या निवृत्त लष्करी अधिकारी यांचे पुत्र होते. मेजर हरमिंदर यांच्या स्मरणार्थ मुंडी खरार येथील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. एवढेच नाही तर मोहाली फेज-6 मधील सरकारी कॉलेजलाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. युद्धात शहीद झाल्यानंतर त्यांची पत्नी रुपिंदर पाल कौर यांना पंजाब सरकारच्या अन्न आणि पुरवठा विभागात नोकरी देण्यात आली.
कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, नवतेश्वरला सैन्यात भरती व्हायचे होते. ग्रेनेडियर्स रेजिमेंटमध्ये त्याच बटालियनमध्ये सामील होऊन त्यांना आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायचे होते. नवतेश्वर यांचा जन्म जानेवारी 1999 मध्ये झाला. वयाच्या तीन महिन्यांत त्यांनी वडिलांना गमावले. नवतेश्वर यांनी चंदीगड येथील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून (पीईसी) मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले आहे. सैन्यात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न होते. आता त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
मेजर हरमिंदर पाल सिंग यांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता –
मेजर हरमिंदर पाल सिंग यांचे शालेय शिक्षण खालसा वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, खरर येथून झाले. त्यानंतर त्यांनी मोहालीच्या शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतले. मेजर हरमिंदर 1992 मध्ये 18 ग्रेनेडियर्समध्ये नियुक्त झाले आणि त्यांची युनिट एप्रिल 1999 मध्ये बारामुल्ला, जम्मू आणि काश्मीर येथे तैनात करण्यात आली. त्यावेळी त्यांनी चकमकीत भाग घेतला होता. 13 एप्रिल रोजी एका गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती युनिटला मिळाली. मेजर हरमिंदर आणि त्यांच्या सैनिकांवर दहशतवाद्यांशी सामना करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यावेळी गोळीबारात अधिकाऱ्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती.
चकमक सुरु असताना मेजर हरमिंदर यांनी पाहिलं की दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचे सैनिक मारले जात आहेत. यानंतर मेजर हरमिंदर यांनी दहशतवाद्यांवर हल्ला करून त्यातील दोघांचा खात्मा केला. मात्र, तिसऱ्या दहशतवाद्याची गोळी त्यांच्या डोक्याला लागली आणि ते शहीद झाले. या धाडसी कामगिरीसाठी मेजर हरमिंदर यांना शौर्य चक्र, शांतताकाळातील तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.